
जीवन अनिश्चित आहे, पण मरण अटळ आहे. वेळ आली की मृत्यू कसा, कुठे गाठेल सांगता येत नाही. गुरुवारी अहमदाबाद विमान दुर्घटनेतून आयुष्याच्या अनिश्चिततेचे विदारक दर्शन घडले. अवघा देश या घटनेने हळहळत असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली. एक मधमाशी निमित्त ठरली आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. कुणालाही खरे वाटणार नाही अशी ही घटना! एकदम अविश्वसनीय! होय, संजय कपूर यांची वेळ आली होती हेच खरे!
बिझनेस टायकून आणि अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचा पती संजय कपूर यांचे गुरुवारी लंडनमध्ये निधन झाले. 12 जून रोजी पोलो खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही तासांत त्यांच्या मृत्यूचे खळबळजनक कारण समजले. संजय कपूर पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली आणि त्यांना चावली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांना हार्ट अटॅक आला. पोलो खेळताना ते मैदानातच कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. संजय कपूर यांचे मित्र, लेखक सुहेल सेठ यांनी ही माहिती दिली.
अविश्वसनीय घटना- कंगना
अविश्वसनीय घटना असा उल्लेख अभिनेत्री व खासदार कंगना राणावत हिने केला. मधमाशीने घशात दंश केला. श्वा2सनलिका बंद झाली. नंतर हृदयविकाराचा झटका येऊन संजयचा मृत्यू झाला. ही दुःखद बातमी आहे. 2025 मध्ये आपल्या आयुष्यात येणाऱया सर्व विचित्र घटना समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. सर्वांनी सुरक्षित राहा, देवाची प्रार्थना करा, असे कंगनाने नमूद केले आहे.
खासगी आयुष्य चर्चेत
संजय कपूर प्रसिद्ध उद्योगपती होते. सोना कॉमस्टारचे ते संचालक होते. पोलो ही त्यांची पॅशन होती. संजय आणि करिश्मा कपूर यांचे 2003 साली लग्न झाले. संजय कपूर यांचा हा दुसरा विवाह होता. 11 वर्षांनंतर संजय -करिश्मा यांनी घटस्फोट घेतला. घटस्पह्टदरम्यान करिश्माने संजय कपूर यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यांना दोन मुले आहेत. समायरा आणि कियान अशी मुलांची नावे आहेत. संजय कपूर यांचा पहिला विवाह फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांच्याशी झाला होता, तर त्यांच्या तिसऱया पत्नीचे नाव प्रिया सचदेवा आहे.
घशात मधमाशी अडकल्यानंतर हार्टअटॅक
– संजय कपूर पोलो खेळत असताना तोंडात मधमाशी गेली. मधमाशीने घशात दंश केल्यामुळे जळजळ होऊ लागली. त्यातच त्यांना हार्ट अॅटॅक आला.
– संजय कपूर यांनी 9 जून रोजी एक्सवर पोस्ट लिहिली होती. त्यांनी लिहिले होते की, पृथ्वीवरील तुमचा वेळ मर्यादित आहे. ‘काय होईल जर’ हा प्रश्न बाजूला ठेवून, त्यांनी ‘का नाही’ या सकारात्मक दृष्टिकोनाने जीवन जगा आणि तुमची स्वप्ने पूर्ण करा.