
देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुपस्थित होते. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात सध्या अत्यंत गंभीर विषय प्रलंबित असताना पंतप्रधान केवळ निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. सर्वपक्षीय बैठक स्वतःहून बोलवायची आणि तिथे स्वतःच गैरहजर राहायचे, ही कार्यपद्धती योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
दरम्यान या बैठकीबद्दल बोलताना राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला आणि पंतप्रधानांना माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आदर्श घेण्याचा सल्ला दिला. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याकडून संसदीय कार्यप्रणाली कशी चालवावी, हे शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. पंडित नेहरू हे स्वतः सर्वपक्षीय बैठकांना उपस्थित राहायचे आणि केवळ उपस्थित न राहता विरोधी पक्षांना योग्य मार्गदर्शनही करायचे, याची आठवण राऊत यांनी करून दिली. मोदींनी नेहरूंच्या संसदीय कार्यप्रणालीचा इतिहास एकदा वाचून पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान केवळ निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांना टोमणे मारण्याचे काम करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. मोदींना सांगा की, नेहरूंचा संसदीय कार्य़प्रणालीचा इतिहास जरा वाचा. नेहरू कसे संसदीय कार्य़प्रणालीचा आदर करायचे ते पहा. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान येत नाहीत आणि त्याऐवजी एखादा मंत्री येऊन केवळ प्रवचन देऊन जातो, हे अत्यंत चुकीचे आहे. मग देशाला पंतप्रधानांची गरज नाही. निवडणूक काळात इतर पक्षाला टोमणे देणे हेच काम आहे का पंतप्रधानांचे? जर पंतप्रधान आपली कर्तव्ये पार पाडत नसतील तर देशाला आता सद्यस्थितीत पंतप्रधानांची गरज नसल्याचे परखड मत राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.



























































