तुळशी तलाव, दहिसर नदीचा मुंबईला धोका ? केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार पालिका तयार करतेय आपत्कालीन कृतीआराखडा

पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव दुर्दैवाने फुटला तर काय करणार आणि शहराजवळून वाहणारी दहिसर नदी अतिवृष्टीत शहरात घुसली तर काय करणार याची चिंता पालिकेला लागली असून याबाबत या दुर्घटना घडू नये आणि घडलीच तर काय उपाययोजना कराव्यात यासाठी पालिका केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार आपत्कालीन कृती आराखडा तयार करीत आहे. या कामांसाठीच्या प्रस्तावाला स्थायी समिती प्रशासक यांनी मंजुरी दिली आहे. याबाबतच्या उपक्रमाला अर्थसंकल्पात पालिकेने 15 कोटींची तरतूद केली आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांमधून दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून 35 किमीवर असणाऱ्या तुळशी तलावातून मुंबईला दररोज 1.8 कोटी लिटर पाणीपुरवठा केला जातो. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.

मात्र भारताचे महालेखा परीक्षक यांच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षमता लेखा परीक्षणाच्या अनुषंगाने संचालक धरण सुरक्षा यांनी मंत्रालय जलसंपदा विभाग यांना सर्व मोठ्या शहरातील धरण/तलावांकरिता आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार आपत्कालीन आराखड्यानुसार अशा स्थितीसाठी पूर्वसूचना, आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष अधिकारी-संबंधित पोलीस ठाणी, रेल्वे स्टेशन, मुख्य कार्यालय आणि सैन्य, लष्करी दल आणि संलग्न संबंधित अस्थापनांनी घ्यावयाची काळजी, जबाबदारी आणि करावयाची कामे नमूद केली जाणार आहेत.

…म्हणून घेतला निर्णय

शहरालगत असणारे मोठे जलाशय, धरण अतिवृष्टी, भूकंप, भस्खलन किंवा कोणत्याही प्रकारच्या भू-नैसर्गिक आपत्तीमुळे फुटल्यास धरणातील पाणी अतिवेगाने शहरता घुसल्यास गंभीर परिस्थिती निर्माण मोठ्या प्रमाणात जीवित-वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे अशा प्रसंगी निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

असा आहे दहिसर नदीचा धोका

मुंबईतील महत्त्वाची नदी असलेली दहिसर नदी समुद्राला मिळण्याआधी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीमधून आणि पश्चिम रेल्वे मार्ग ओलांडून जाते. त्यामुळे धरण फुटल्यास होणाऱ्या परिणामांमध्ये धरणाराखाली परिसर, धरण फुटल्यानंतर नदीची निर्माण होणारी उच्चतम पातळी, धोक्याची खुणा आणि प्रतिबंधक उपाय केल्यास जीवित-वित्तहानी टाळण्यास मोठी मदत होणार आहे.