
पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या दबावाला बळी पडले अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच कुंकवाचं झाड लावण्यापेक्षा तुम्ही संसदेत अधिवेशन बोलवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी केलेले विधान हे सैन्याबाबतीत नव्हतं. ना पंतप्रधानांविरोधात होतं ना राष्ट्रपतींबाबत. घरोघरी सिंदूर वाटायला जाणार होते काय पराक्रम केला आहे तुम्ही? पराक्रम तर सैन्याने केला आहे. मोदींनी घराबाहेर कुंकवाचे झाड लावले आहे. राजकीय फायदा करून घेण्यासाठी तुम्ही जे राजकारण करत आहात, तर आवाज तर तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन शस्त्रसंधी केली. देशाशी तुम्ही परवानगी घेतली होती? संसदेला विचारलं होतं का? आमच्या फौजा पुढे गेल्या होत्या, पाकव्याप्त घेण्याची चर्चा सुरू होती, तुमचे संरक्षण मंत्री म्हणत होते की पाकव्याप्त कश्मीर आता हाती येईल. आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या दबावाला तुम्ही बळी पडलात. हिंदुस्थान असा कधी झुकला नव्हता. देशाचे नेतृत्व असं कुणापुढे झुकलं असेल तर त्याला आत्मसमर्पण केल्याचं म्हणतात. हे फक्त आम्ही नाही म्हणत. आता पुतीनही म्हणाले. मग पुतीन काय पाकिस्तानचे एजंट आहेत का? तुम्ही आपल्या देशाचे प्रतिनिधी परदेशात पाठवले आम्ही त्याचे स्वागत केले. पण पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक देश पुढे आले आहेत. याबाबात देशाची धोरणं ठरवण्याऱ्यांनी विचार केला पाहिजे. एशियन डेव्हलपमेंट बँकेने पाकिस्तानला कर्ज दिले आहे. त्या बँकेचे अध्यक्ष काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींन भेटून गेले. मोदींनी अध्यक्षांना सांगितले की पाकिस्तानला कर्ज देऊ नका, त्या पैशांचा वापर ते दहशतवादासाठी करतील. तरी पाकिस्तानला त्या बँकेने हजारो कोटी रुपयांच कर्ज दिले आहे.
बिलावल भुट्टो युनाटेड नेशन्समध्ये आपल्याविरोधात भाषण देत आहे. आपलं शिष्टमंडळ 27 मे रोजी कुवैतला गेलं होतं आणि कुवैतने पाकिस्तान व्हिसावर जो बॅन लाववला होता तो 28 मे ला हटवला. हे आमचं यश. देशाची जनता तर हे प्रश्न विचारणार तुम्ही घाबरता कुणाला? कुंकवाचं झाड लावण्यापेक्षा तुम्ही संसदेत अधिवेशन बोलवा आणि प्रश्नांची उत्तरं द्या. त्यालाच लोकशाही म्हणतात. आम्ही प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं न देता पळून जाता याचा अर्थ तुम्ही देशद्रोही आहात. परंतु जगात भारताची बे अब्रू होत आहे. जी 7 बैठकीचं भारताला निमंत्रण का नाही दिलं याचे उत्तर पंतप्रधान मोदी देणार का? मोदींजींना पण हे माहित नसेल कारण तिथे ट्रम्प आहे. जर ट्रम्पने मोदींच्या समोरच सांगितलं की मी युद्ध थांबवलं तर काय मोदी मंचावरच ट्रम्प यांचं तोंड दाबतील का? असे झालेच नाही असे सांगण्याची त्यांची हिंमत आहे का? जर अशी हिंमत नसेल तर त्या नेतृत्वाला सरेंडर केलं असंच म्हणतात असे संजय राऊत म्हणाले. तसेच आम्ही बघतोय आता ट्रम्प आणि अदानींची मैत्री कधी संपतेय. मस्क आणि ट्रम्पची मैत्री संपली आहे. मस्क हा हुशार माणूस आहे, तो फक्त पैसाच कमवत नाहिये तर इतरही चांगली कामं करतोय असेही संजय राऊत म्हणाले.