
सीबीएसई बोर्डाने दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने 2026 पासून बोर्डाच्या परिक्षेमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता एक वर्षात या विद्यार्थ्यांना दोनदा बोर्डाच्या परिक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांवरील दबाव कमी करण्यासाठी तसेच सुधारणांसाठी संधी मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
CBSE बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सीबीएसईच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा दोनदा होणार आहेत. पहिली परिक्षा ही फेब्रुवारी महिन्यात होणार तर दुसरी मे महिन्यात घेतली जाणार आहे. यात पहिली परीक्षा सर्वांना बंधनकारक असेल तर दुसरी परीक्षा ही बंधनकारक नसून ज्याला पुन्हा परीक्षा द्यायची आहे, तो या परीक्षेला बसू शकतो. जर एखादा व्यक्ती पहिल्या परिक्षेत मिळालेल्या गुणांवर समाधानी नसेल तर तो दुसरी परीक्षा देऊ शकतो.
विद्यार्थी आपल्या चुकांतून शिकत असतात त्यामुळे पहिल्या परीक्षेत चुका झाल्या तर दुसऱ्या परीक्षेत सुधारणा करू शकतात. विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी व त्यांच्यात सुधारणा होऊन त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतला आहे.