नवी मुंबई विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने लटकावला, 24 जूनपासून भूमिपुत्र रस्त्यावर उतरणार

भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र मोदी सरकारने हा प्रस्ताव लटकावला असून भाजप जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप होत आहे. याविरोधात 24 जून रोजी भूमिपुत्र रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मागील पाच वर्षांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातून संघर्ष सुरू आहे. मात्र त्यानंतरही केंद्र सरकारकडून नामकरणाबाबत कोणतीही ठोस कृती झालेली नाही. राज्य व केंद्र सरकारच्या या धरसोड वृत्तीमुळे प्रकल्पग्रस्तांमध्येच तीव्र असंतोषाचा भडका उडाला आहे. 23 जूनपर्यंत दिबांच्या नामकरणाची अधिसूचना जारी न केल्यास 24 जूनपासून दिबांच्या स्मृतिदिनापासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा कृती समितीचे सरचिटणीस भूषण पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे. समितीच्या अनेक सदस्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
भूमिपुत्रांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी केंद्रीय नागरी राज्य उड्डाणमंत्री मोहोळ यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्रात परतलेल्या या मंडळींनी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन दडपण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यातील पुरंदर, छत्रपती संभाजीनगर आदी एकूण चार विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची आवई उठवली आहे. महत्त्वाचे म्हणजे या मुद्यावर वेळ मागूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेळ देत नसल्याची माहिती लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे सरचिटणीस भूषण पाटील यांनी दिली. त्यामुळे उपोषणाच्या भूमिकेवर कृती समिती ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.