हिमाचल व उत्तराखंडमध्ये ढगफुटी; घरे वाहून गेली, 34 जणांचा मृत्यू; चारधाम यात्रा थांबवली

मान्सूनने संपूर्ण देश व्यापला असून गेल्या आठवड्यापासून सातत्याने सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे अनेक राज्यांमध्ये अक्षरशः पूर आला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त झाले असून अनेक घरे, वाहने वाहून गेली. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा पुढील 24 तासांसाठी थांबवण्यात आली आहे. दुसरीकडे ओदिशाच्या मयूरभंज जिह्यात तुफान पावसामुळे जमुआ घाट पूल तुटला आहे. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात अनेक जिह्यांमध्ये भूस्खलन झाले आहे.

अनेक भागाता पूरस्थिती निर्माण झाली आहे. विविध घटनांमध्ये 20 जूनपासून आतापर्यंत एकूण 34 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे महसूल मंत्री जगत सिंह नेगी यांनी दिली आहे. धर्मशाळामध्ये आलेल्या पुरामध्ये 9 जण वाहून गेले. त्यातील सात जणांचे मृतदेह सापडले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. नुकसान आणि राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी हिमाचल सरकारने सोमवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

उत्तराकाशीत 2 मजुरांचा मृत्यू, 7 बेपत्ता

उत्तरकाशीत यमुनोत्री मार्गावर ढगफुटीमुळे 2 मजुरांचा मृत्यू झाला तर 7 जण बेपत्ता झाले. हॉटेल बांधकामासाठी आणलेले ते मजूर होते, अशी माहिती जिल्हा महानगर न्यायदंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी दिली. भूस्खलन झाले तेव्हा बांधकामाच्या ठिकाणी 20 मजूर होते. त्यातील 20 मजुरांना सुरक्षितस्थळी नेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजस्थानात उदयपूर, जालोर, पाली, सिरोहीसह अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पाली जिह्याच्या देसुरी आणि बाली येथे मघाई नदी दुथडी भरून वाहत आहे. टोंक जिह्यात मित्रांसोबत पिकनिकसाठी आलेला तरुण बनास नदीत बुडाला.

ओदिशात क्योंझर, बालासोर, मयूरभंज, भद्रक, कटक, खोरधा, गंजम आणि पुरीसह 16 जिह्यांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

झारखंडमध्ये जमदेशपूर येथे लव कुश शाळेत अडकलेल्या 162 मुलांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले. मुसळधार पावसामुळे शाळा पुराच्या पाण्यात बुडाली. सोशल मीडियावरून याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जमशेदपूर पोलीस आणि बचाव पथकाने मुलांना सुरक्षितस्थळी नेले.