मीरा-भाईंदरमध्ये ‘मराठी मोर्चा’ का काढू दिला नाही? पाहा मुख्यमंत्री काय म्हणाले…

मीरा-भाईंदरमध्ये मंगळवारी सकाळी निघणाऱ्या ‘मराठी मोर्चा’ला परवानगी नाकारण्यात आली. प्रचंड राजकीय दबावाखाली असलेल्या पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत दडपशाही केली. पोलिसांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची, मराठी प्रेमींची धरपकड सुरू केली. यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मराठी माणसाने मराठीसाठी महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही तर कुठे काढायचा? परप्रांतीयांना मोर्चा काढू देता, मग मराठी माणसावर दादागिरी का? असा सवाल उपस्थित झाला. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून मोर्चा का काढू दिला नाही हे स्पष्ट केले.

विधिमंडळाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी मीरा-भाईंदर येथील ‘मराठी मोर्चा’बाबत प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, कुणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण देतो. मीरा-भाईंदर येथील मोर्चाच्या मार्गा संदर्भात चर्चा सुरू होती असे मला आयुक्तांनी सांगितले. पण ते जाणीपूर्वक अशा प्रकारचा मार्ग मोर्चासाठी मागत होते ज्यातून कुठेतरी संघर्ष होईल. तसेच काही लोकांच्या संदर्भात पोलिसांना इनपुट मिळाले होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी एवढेच सांगितले की जो नेहमी मोर्चाचा मार्ग असतो तो वापरा. पण त्यांनी नकार दिला आणि याच मार्गावरून मोर्चा काढणार असे म्हटले. त्यामुळे परवानगी नाकारली.

मुख्यमंत्री नक्की मराठीच आहे की त्यांच्या अंगात मोरारजी देसाईंचा आत्मा शिरलाय? संजय राऊत यांचा फडणवीसांवर हल्लाबोल

राज्यात कुणालाही मोर्चा काढायचा असेल तर आपण परवानगी देतो. पण आम्हाला इथेच काढायचा आहे, असाच काढायचा आहे अशा प्रकारे कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न झाला तर ते योग्य नाही. सगळ्यांना एकत्र रहायचे आहे. राज्याच्या विकासाचा विचार करायचा आहे. त्यामुळे योग्य मार्ग देऊन परवानगी मागितली तर कधीही परवानगी देऊ, असेही फडणवीस म्हणाले.