
आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागा स्नान फार महत्त्वाचे मानले जाते. चंद्रभागा स्नानासाठी नदीपात्रात मोठय़ा प्रमाणात भाविकांची गर्दी होते. तसेच येणारे भाविक चंद्रभागा नदीत नौकाविहार करतात. या कालावधीत कोणतीही अनुचित घडना घडू नये तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व होडीमालकांनी व चालकांनी आसनक्षमतेपेक्षा जास्त लोकांची वाहतूक करू नये तसेच 15 जूनपर्यंत होडय़ांची नोंदणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे होडीमालक व चालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, भीमा पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता एस. के. हरसुरे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपकार्यकारी अभियंता ज्योती इंगोले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले तसेच होडीमालक व चालक उपस्थित होते.
सूर्यास्तानंतर जलप्रवास वाहतूक बंद ठेवावी
आषाढी वारी कालावधीत चंद्रभागा नदीपात्रात साधारणतः 6 ते 8 हजार क्युसेक इतका विसर्ग आल्यास जलप्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी. सूर्यास्तानंतर जलप्रवासी वाहतूक करू नये. होडीत लाईफ जॅकेटची उपलब्धता ठेवावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास भाविकांना नदीपात्रात जाण्यापासून परावृत्त करावे. यापूर्वीही चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेबाबत होडीचालक, मालकांचे प्रशासनास चांगले सहकार्य लाभले असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.