
माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने जुने दिवस विसरले नाही पाहिजेत. प्रत्येक गोष्टीची जाणीव ही आयुष्यभर ठेवली जाणे आवश्यक आहे. यश मिळाल्यानंतर आपल्याला सर्व काही मिळते. मात्र संघर्षाच्या दिवसांत मदत करणाऱ्यांना विसरू नका, त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवणे हा आयुष्यातील सर्वात मोठा ठेवा आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री अकला कुबल यांनी नेरूळ येथील एका कार्यक्रमात केले आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मदत करणाऱ्या गजानन लीला चॅरिटेबल ट्रस्टच्या वार्षिक सोहळ्याला अभिनेत्री अलका कुबल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आयुष्यात सर्व काही फक्त फायदा पाहूनच केले नाही पाहिजे. गजानन लीला ट्रस्ट जे कार्य करीत आहे, त्यातून मनाला मोठा आनंद आणि समाधान मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मुलांच्या मागे ही ट्रस्ट खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे या मुलांच्या स्वप्नांना पंख फुटले आहेत, असेही अलका कुबल यांनी स्पष्ट केले. आएएस आणि आयपीएस घडवणारे डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, उपाध्यक्ष दीपक जाधव, संस्थापक सचिव जगदीश जाधव, भरत पटेलिया, विजय लखानी, सुनील अनावकर, एम. जगन्नाथ राय, स्मिता म्हात्रे आदी उपस्थित होते.
|






























































