
मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या प्रारंभी कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणी आटोपली. काळ्याभोर शिवारात काही हिरवीगार पावसाने मोडं देखील उगवली. पण गेल्या काही दिवसांत वरुणराजाने उघडीप दिल्याने कोवळी पिके जगतील की नाही अशी परिस्थिती आहे. दररोज नभ दाटून येत असले तरी पाऊसधारा मात्र बरसत नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवतेय की काय या विवंचनेत बळीराजा चिंतातुर आहे.
उन्हाळ्यातील अवकाळी पावसाच्या जोरदार तडाख्याने जमिनीत थोडीफार ओल जाणवत होती. त्यानंतर जूनच्या सुरुवातीला मान्सूनच्या पावसाने देखील चांगलीच बॅटिंग केली. त्यामुळे नायगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी 11 जूनपासून मोठ्या आशेने खरीप पिकांची पेरणी केली. यापूर्वीच्या पावसाने काहीशी ओल असल्याने कोवळ्या मोडानी शिवार खुलले. मान्सूनच्या पहिल्याच पावसात पेरणी केल्याने नरसी परिसरातील अनेक गावातील शेतांमध्ये बियाणांची चांगली उगवणं झाल्याचे चित्र आहे. पण काही दिवसांपासून सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून येत असले तरी पाऊस मात्र पडत नसल्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे.
उगवलेल्या कोवळ्या मोडांना आता पावसाची नितांत गरज आहे. पावसाने येत्या काही दिवसात आभाळमाया न दाखवल्यास काळ्याभोर शिवारात उगवलेली हिरवीगार कोवळी मोडे कोमेजून जाण्याची भीती व्यक्त होत असून, वरुणराजाने जर अवकृपा दाखवली तर असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.