नौसेना इन ऍक्शन; मुंबईलगतच्या समुद्रात सुरक्षेसाठी दंड थोपटले, मच्छीमारांना संवेदनशील ठिकाणी न जाण्याची ताकीद

दहशतवादाला खतपाणी घालणाऱया पाकिस्तानचे पंबरडे मोडण्यास हिंदुस्थानने सुरुवात केल्याने पाकिस्तान हादरला आहे. त्यातूनच त्यांच्या कुरापती वाढल्या असून हिंदुस्थानवर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईलगतचा सुमद्रकिनारा अधिक सुरक्षित करण्यासाठी नौसेनेने दंड थोपटले आहेत. गस्त व निगराणी अधिक प्रभावी सुरू केली असून मच्छीमारांना संवेदनशील ठिकाणी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे नौसेनेच्या सूत्रांकडून समजते.

हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणाव वाढला आहे. युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणांनी आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पण त्याचबरोबर समुद्रमार्गे पाकिस्तानकडून कुठल्याही कुरापती होऊ नये याकरिता नौसेनेनेदेखील दंड थोपाटले आहेत. संपूर्ण समुद्रकिनाऱयावर नौसेनेकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे. गस्त वाढविण्यात आली असून खडा पहारा देण्यास सुरुवात झाली आहे. समुद्रमार्गे पाकिस्तानने काही कुरापती करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तेथेच जलसमाधी देण्यासाठी नौसेनेचे जवान सज्ज झाले आहेत. अशा परिस्थितीत मच्छीमारांनी संवेदनशील ठिकाणी जाण्याचे टाळावे. नौदलाने आखून दिलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणी आढळून आल्यास अनुचित प्रकार घडेल, त्यामुळे याची विशेष खबरदारी घेण्याची ताकीद मच्छीमारांना देण्यात आल्याचे समजते.

मच्छीमार बोटींवर वॉच
मच्छीमार बोटींच्या प्रत्येक हालचालींवर देखील नौदल जवानांकडून लक्ष राहणार आहे. शिवाय प्रत्येक बोटीचे सर्वेक्षण करून एका विशेष अॅपद्वारे सर्व बोटींची माहिती गोळा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते