
>> संदीप आडसूळ
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील गणेशोत्सवाला स्वातंत्र्यपूर्व ऐतिहासिक वारसा लाभला आहे. येथे सन १९२३मध्ये स्थापन झालेल्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला या वर्षी १०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजतागायत येथे पारंपरिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा केला जातो.
सन १९१६चा काळ सारा देश स्वातंत्र्याच्या चळवळीने पेटून उठला होता. अशा वेळी देव, देश अन् धर्माची शिकवण देण्यासाठी गणेशवाडीत लोकसेवा संघ वाचनालय व व्यायामशाळा स्थापन झाली. लोकमान्य टिळक कर्नाटक दौऱ्यावर असताना गंगाधर देशपांडे यांच्या प्रयत्नाने त्यांना संघाने गणेशवाडीत आणले. सन १९१७मध्ये येथे टिळकांची मोठी सभा झाली. सभेला अंदाजे तीन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. यावेळी गणेशवाडीकरांनी स्वांतत्र्य चळवळीस १५० रुपयांची देणगीही दिली होती.
या भेटीत लोकमान्य टिळकांनी लोकसेवा संघास गणेशोत्सवाची प्रेरणा दिली. यावेळी संघाचे अध्यक्ष असलेले मास्तर श्रीपाद मराठे यांच्या पुढाकाराने वाचनालयाच्या कार्यालयात गणेशवाडीचा पहिला गणेशोत्सव साजरा झाला. तीन ते चार वर्षे संघामध्ये गणेशोत्सव साजरा झाला. सन १९२३मध्ये गणेशवाडीत याला व्यापक स्वरूप प्राप्त व्हावे, स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळावे, स्वातंत्र्याच्या प्रेरणेने गावातील तरुण एकत्र यावेत यासाठी हा उत्सव सार्वजनिक केला.
सन १९२३मध्ये गावातील मुख्य चौकात गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या नावे सुरू करण्यात आला. अल्पावधीतच या उत्सवास भव्य स्वरूप प्राप्त झाले. सारा गाव एक झाला. लेझीम, सभा, मेळावे, नाटक असे विविध कार्यक्रम होऊ लागले. १९५० ते १९८०च्या दशकात विविध सामाजिक, कौटुंबिक नाटकांनी हा उत्सव वेगळ्याच ऊंचीवर नेऊन ठेवला.
गणेशवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मेळा पथकांनी पुण्यातील उत्सवही गाजविला. अॅड. राघवेंद्र गोरवाडे, अप्पासाहेब गावडे, चिंतामणी भट आणि संस्थेचे कार्यकर्ते त्या वेळच्या प्रेरणेने राष्ट्रीय सेवेची भावना जोपासत. त्याच उत्साहात आजही पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करीत आहेत. श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला सन २०२३मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली.
पहिला गणेशोत्सव ज्या मखरात साजरा झाला, ते मखर लोकसेवा संघाने आजही सुस्थितीत जतन करून ठेवले आहे. लोकसेवा संघ आजही सर्व परपंरा, गावातील सांस्कृतिक, राष्ट्रीय सेवा आणि राष्ट्रभक्तीचा वारसा जपत गणेशोत्सव साजरा करतो. याचा सार्थ अभिमान गावास व संस्थेस आहे. आज अनेक संस्था संस्थेच्या पाठीमागे ठामपणे उभ्या आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील सुमारे २५ गणेश मंडळे स्वागतकमानीच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेश देत आहेत.
“गणेशोत्सवानिमित्त श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्था कोणत्याही स्वरूपाची गाववर्गणी गोळा करीत नाही. स्वच्छेने देणगी दिलेल्या पैशांतूनच गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. ‘श्रीं’ची मूर्ती ही शाडू मातीपासून बनविलेली असते. तसेच ‘श्रीं’चे आगमन आणि विसर्जन पालखीतूनच केले जाते. यामुळे पारंपरिकतेचा वारसा आजही जपला जात आहे.”
बळवंत गोरवाडे, सामाजिक कार्यकर्ते, गणेशवाडी