काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावाच लागेल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अॅक्शन मोडवर

कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक बांधणीवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसचे पद असणाऱया पदाधिकाऱयांना पक्षासाठी वेळ हा द्यावच लागेल, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी आज मांडली. कोणत्याही संयुक्तिक कारणांशिवाय सलग तीन बैठकांना गैरहजर राहणाऱया पदाधिकाऱयाला कार्यमुक्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रदेश कॉँग्रेस कार्यकारिणीची बैठक टिळक भवन दादर येथे पार पडली. या बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 2025 हे वर्ष संघटन वर्ष घोषित केले आहे. त्या अनुषंगाने संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाची पदे असणाऱयांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल, असे सांगितले.

जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान दहा पूर्ण दिवस वेगवेगळय़ा ब्लॉकमध्ये फिरावे, पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी, महिन्यातून किमान एक बैठक घेतली पाहिजे. तर ब्लॉक अध्यक्षांनी महिन्यातून किमान आठ पूर्ण दिवस प्रभागांमध्ये फिरावे. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे. महिन्यातून किमान एक बैठक घ्यावी. प्रदेश पदाधिकाऱयांनी नेमून दिलेल्या जिह्यात महिन्यातून किमान सहा पूर्ण दिवस दौरे करावे, दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. महिन्याच्या 10 तारखेला प्रदेश कार्यालयाला अहवाल सादर करावा, अशा सूचना पदाधिकाऱयांना देण्यात आल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

राज्यात संविधान बचाव व सद्भावना यात्रा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. 29 एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून 1 मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर 4 व 5 मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा व संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.