
राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीएकडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी असे सपकाळ म्हणाले.
राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हजारो लाखो होक्टवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना याचा मोठा फटका बसला आहे पण सरकारकडून मदत देणे दूरच साधे पंचनामे ही केले जात नाहीत. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे आणि खतांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. बियाणे आणि खतांची लिंकींग करून विक्रेत्यांकडून शेतक-यांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर सरकारने तात्काळ कठोर करावाई करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.