कल्याणमध्ये अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, महापालिकेपर्यंत पाठलाग केला

शुक्रवारी रात्री उशिरा कल्याण स्टेशन परिसरात कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमणविरोधी पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कारवाई करताना मालाची नासधूस तसेच पथकातील काही कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याने 20 ते 25 फेरीवाल्यांनी जोरदार राडा केला. सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि महिला सुरक्षा कर्मचारी लता बोरीकर यांना धक्काबुक्की करत नखाने ओरबाडण्यात आले. इतकेच नाही तर पथकाचा पाठलाग करत महापालिकेचे कार्यालय गाठत आधी आमच्या वस्तू द्या अन्यथा जीवाचे बरेवाईट करू, असा इशारा दिला. त्यामुळे महापालिका परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी हल्लेखोर फेरीवाल्यांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांच्या खाबुगिरीमुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी फुटपाथ तसेच महत्त्वाचे रस्ते अडवले आहेत. त्यामुळे नेहमीच या भागात प्रचंड वाहतूककोंडी होत असते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी प्रवाशांना तर चालणे मुश्कील होऊन जाते. याबाबत अनेकदा तक्रारी केल्यानंतरही प्रशासन ढिम्म असते. त्यामुळे फेरीवाल्यांची मुजोरी वाढली असून याचा तडाखा शुक्रवारी संध्याकाळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच बसला. काल रात्री उशिरा सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात व अतिक्रमण विभागाची टीम कारवाईसाठी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात गेली होती. यावेळी काही फेरीवाले व अधिकाऱ्यांमध्ये वस्तू जप्त करण्यावरून धक्काबुक्की झाली. यात जप्त केलेल्या सामानाची नासधूस झाल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे.

आम्हाला मारण्याचा अधिकार यांना कुणी दिला?
कारवाईसाठी गेलेल्या पथकातील काही कर्मचाऱ्यांनी माल जप्त करताना मारहाण केल्याचा आरोप फेरीवाल्यांनी केला आहे. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई करत पालिका मुख्यालय गाठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फेरीवाल्यांनी त्यांचा पाठलाग करत पालिका मुख्यालय गाठत जोरदार धिंगाणा घातला. आमचा जप्त केलेला माल परत करा.. आम्हाला मारण्याचा अधिकार पालिका अधिकाऱ्यांना दिला कुणी, असा सवाल केला. वाढत्या तणावामुळे पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी मुख्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. त्यानंतर अधिकच चिडलेल्या फेरीवाल्यांनी तेथेच ठिय्या देत जप्त केलेला माल परत न दिल्यास स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करण्याचा इशारा दिला. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर फेरीवाले पांगले.