जालना शहर, जिल्हयात जोरदार पाऊस

चातकासारखी वाट पहायला लावणारा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. सलग तीन दिवस पाऊस झाल्यानंतर एक दिवसाची विश्रांती झाल्यानंतर आज रविवारी 25 मे रोजी जालना शहरात जोरदार सरी कोसळल्या.

पावसामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची मोठी फजिती झाली. शहरातील मामाचौक, वीर सावरकर चौकात घाण पाण्याचे पाट वाहिल्याने पाऊस थांबल्यानंतर रस्त्यावर घाण साचल्याचे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले. हवामान विभागाकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा अगोदरच देण्यात आलेला आहे. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. आज रविवारी दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. दुपारनंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अधून मधून पाऊस सुरूच होता. दिवसभर अधून मधून सरी कोसळत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होते. भिजपावसाने जालनेकर ओलेचिंब झाले.

रविवारी दुपारनंतर सायंकाळी शहर व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावून सुखद धक्का दिला. आज सकाळपासूनच आभाळ भरून आलेले होते. दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. सायंकाळी वातावरण ढगाळी होऊन पावसाला सुरूवात झाली. एक ते दीड तास पाऊस झाल्याने शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यातील काही गावांमध्येही पावसाने हजेरी लावली. पावसामुळे झोपडपट्टी भागात अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. जुना जालन्यातील शनिमंदिर, टाऊन हाल भागातील रस्ते जलमय झाले होते.

शहागडला मध्यम स्वरूपाचा पाऊस
वडीग्रोद्री : अंबड तालुक्यातील शहागड परिसरातील गोरी-गंधारी, डोमलगाव, कुरण, वाळकेश्वर, पाथरवाल बु. शहागड येथे रविवारी तीन वाजता ढगाळ वातावबरणानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस एका तासापेक्षा जास्त वेळ झाला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग 52 वरील वाहनधारक वाहने लाईट लावून चालवलीत होते. सर्वत्र वातावरणांत गारवा आणि चार दिवसांपासून शहागड परिसरात पाऊस पडत आसल्याने शेतकरी आनंदी असून, कपाशी बियाणांसाठी कृषी केंद्रात शेतकऱ्यांची लगबग राहणार आहे. पावसामुळे ऊस पिकाला मे महिन्यात चौथी पाळी मिळालेली असून शेतकऱ्यांचे पाण्याचे हाल थांबले आहेत.