
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी सकाळपासून सोसाट्याचा वारा आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने पुढील चार दिवस या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. पावसामुळे देवगड जामसंडे शहराचा संपर्क तुटला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
गुरुवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे देवगड निपाणी मुख्य रस्त्यावर पेट्रोल पंप ते गणेश नगर परिसरात गुडघ्याहून अधिक पाणी रस्त्यावर साचले. यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आजूबाजूच्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
वाहनचालकांमधून तसेच आजूबाजूच्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आता तरी प्रशासनाला जाग येणार का? मुसळधार पावसात होणारी सातत्याने वाहतूक कोंडी सोडवणार का? असे सवाल नागरिक करत आहेत. याकडे आता प्रशासन किती गांभीर्याने पाहते हे पहावे लागेल.