
पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून सतत हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागात हल्ले करण्यात येत आहे. मात्र हिंदुस्थानने पाकिस्तानचे सगळे हल्ले हाणून पाडले आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यांच्या अयशस्वी प्रयत्नांदरम्यान हिंदुस्थानी सरकारने शनिवारी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने पाकिस्तानला स्पष्ट संदेश देताना असं म्हटलं गेलं आहे की, जर हिंदुस्थानावर कोणताही दहशतवादी हल्ला झाला तर तो युद्ध मानला जाईल. भविष्यात होणारी कोणतीही दहशतवादी कारवाई हिंदुस्थानविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल, असं वृत्त ‘एबीपी न्यूज’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
दरम्यान, हिंदुस्थानने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आलेल्या हल्ल्यात अबू जुंदाल, हाफिज मोहम्मद जमील, मोहम्मद युसूफ अझहर, खालिद उर्फ अबू आकाश आणि मोहम्मद हसन खान सारखे दहशतवादी ठार करण्यात हिंदुस्थानी सैन्याला यश आलं आहे. यात युसूफ हा कंधार अपहरणाचा सूत्रधार होता आणि जुंदाल मुंबई हल्ल्यात सहभागी होता.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने 9 दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. हे पाचही दहशतवादी एकत्र मारले गेले की, वेगळे मारले गेले याची माहिती अद्याप मिळालेली नाही.