जगन्नाथपुरी रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 550 हून अधिक भाविक जखमी

ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ पुरी रथयात्रा उत्सवादरम्यान शुक्रवारी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. भाविकांची प्रचंड गर्दी उसळली असतानाच गोंधळ उडाला आणि त्यात तब्बल 550 हून अधिक भाविक जखमी झाले. भगवान बलभद्र यांचा रथ ओढण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. जगन्नाथ रथयात्रेची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. याच परंपरेचा भाग म्हणून काढल्या जाणाऱ्या तीन भव्य रथांपैकी एक असलेल्या तलध्वज रथाच्या औपचारिक ओढणीदरम्यान गर्दी उसळून भाविक जखमी झाले.

भगवान जगन्नाथांचा रथयात्रा उत्सव देशातील लाखो भाविकांना आकर्षित करतो. यंदाही प्रतिवर्षीप्रमाणे भाविकांनी भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ-बहिण भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उसळण्याची शक्यता गृहित धरुन स्थानिक प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली नव्हती. त्यामुळे नियोजनाच्या अभावाने चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती उद्भवली. त्यात 550 हून अधिक भाविकांना दुखापत झाली. त्यांना जवळच्या विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याचे समजते.

भगवान बलभद्र यांचा तलध्वज रथ ओढताना गोंधळ निर्माण झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रथयात्रेच्या मार्गात एक धोकादायक वळण असून त्या वळणावर रथ ओढताना भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक रथ ओढणे थांबल्यामुळे बहुसंख्येने भाविक एकाच ठिकाणी जमा झाले होते. याचदरम्यान काही लोक प्रतिबंधित क्षेत्रात घुसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. काहीवेळात गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने अनेकांना दुखापत झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.