महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेस सुमारे चार लाख भाविकांनी हजेरी लावली. रविवारपासूनच भाविकांच्या गर्दीने जेजुरीनगरी फुलून गेली.
नाताळच्या सुट्टी आणि मार्गशीर्ष महिन्यात आलेल्या सोमवती यात्रेमुळे जेजुरीला अपेक्षेपेक्षा जादा गर्दी झाली. मुंबईहून हजारोंच्या संख्येने कोळी व आगरी बांधव जेजुरीत यात्रेसाठी मुक्कामी आले होते.
सोमवारी दुपारी एक वाजता घडशी समाजातील मानकऱ्यांनी सनई-ढोल वाजवून पालखीला शेडा दिला. इनामदार पेशव्यांनी सूचना करताच खांदेकऱ्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली.
‘सदानंदाचा येळकोट,’ ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्यांची प्रचंड उधळण केल्याने सारा गड पिवळाधमक झाला. ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी…’ या उक्तीचा साऱ्यांनाच अनुभव आला.
गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली. पालखी गडाबाहेर गेल्यानंतरही बाहेर पडताना भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होत होती. श्री मार्तंड देवस्थानने यात्रेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन योग्य नियोजन केले होते.
खंडोबाची पालखी वाजतगाजत गडावरून खाली आणण्यात आली. छत्री देऊळ येथे भेटून पालखी सायंकाळी कन्हा नदीवर पोहोचली. तेथे धार्मिक वातावरणामध्ये पालखीमधील खंडोबा आणि म्हाळसादेवी या मूतींना कहास्नान घालण्यात आले. यावेळी कऱ्हा नदीवर हजारो भाविक उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक भाविकांनी स्नान केले.
यंदा नदीला भरपूर पाणी असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी बोटी व जीवरक्षक पथक नेमण्यात आले असल्याची माहिती मुख्य विश्वस्त अभिजित देवकाते यांनी दिली. सायंकाळी रात्री उशिरा पालखी खंडोबा गडावर आल्यावर रोजमोरा (ज्वारी धान्य) वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली.