
वादाचा मुद्दा बनलेल्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा बंदोबस्त अखेर झाला आहे. मुंबई आता भोंगेमुक्त झाली आहे. धार्मिक स्थळांवरील भोंगे यशस्वीरीत्या हटविण्यात पोलिसांना यश आले असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर स्वयंस्फूर्तीने धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्यात आले आहेत.
शहरातील भोंग्यांच्या आवाजामुळे वाद निर्माण व्हायचा. त्यामुळे भोंगे हटविण्याची मागणी नागरिक तसेच सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी करण्यात येत होती. देवेन भारती यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी भोंग्यांचा विषय गंभीरतेने घेतला. भारती यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील धार्मिक स्थळांशी संबंधित पदाधिकारी, धर्मगुरूंच्या बैठका घेऊन त्यांना स्वतःहून भोंगे हटविण्याचे आवाहन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
भोंगे हटविल्यास ध्वनिप्रदूषण होणार नाही. शिवाय कर्णकर्कश्श आवाजामुळे होणारा वाद टाळता येईल. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्वतःहून भोंगे हटवावेत, असे आवाहनही करण्यात आले होते. या प्रक्रियेमध्ये विशिष्ट धार्मिक स्थळांना लक्ष्य न करता सर्वांनाच भोंगे काढण्यास सांगण्यात आले होते.
पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याबाबत पोलिसांनी बैठका घेऊन केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने वादाचा मुद्दा बनलेले भोंगे धार्मिक स्थळांशी संबंधित पदाधिकारी व धार्मिक गुरूंनी स्वतःहून हटविले आहेत. या कृतीचे पोलिसांनी स्वागत केले आहे.
शहरातील धार्मिक स्थळांवरील भोंगे पद्धतशीर व यशस्वीरीत्या काढून टाकण्यात आम्हाला यश आले आहे. आम्ही आवाहन केले आणि त्याला उत्तम प्रतिसाद देत संबंधितांनी भोंग्यांचा बंदोबस्त केला. त्यामुळे मुंबई आता भोंगेमुक्त झाली आहे, असे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.