
राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी विविध राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. आता निवडणूक आयोगानेही यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. आता त्याचे पडघम सुरू झाले आहेत.
राज्यातील 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायती आणि 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका आगामी काळात घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. आता राज्य निवडणूक आयोगानेही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावले आहे.
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.
निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मतदार संख्या, मतदान केंद्र, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, आवश्यक मनुष्यबळ, वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे या विषयाच्या अनुषंगाने माहिती तयार करून ती आयोगास पीडीएफ फॉरमेटमध्ये ई-मेलद्वारे 9 जुलै 2025 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी. तसेच सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे.