मोदींनी 11 वर्षांत केल्या 33 चुका! काँग्रेसचा जबरदस्त प्रहार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जबरदस्त प्रहार करीत मोदींनी 11 वर्षांच्या कार्यकाळात तब्बल 33 मोठय़ा चुका केल्याचे म्हटले आहे. भाजप सरकारने ‘ईडी’सारख्या केंद्रीय एजन्सीची भीती घालून काँग्रेस पक्ष फोडण्याचाही प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मी गेल्या 65 वर्षांपासून राजकारणात आहे. मात्र मोदी यांच्यासारखा खोटे बोलणारा पंतप्रधान आजपर्यंत कधीही पाहिला नाही, असा सणसणीत टोलाही खरगे यांनी लगावला आहे.

‘आपण खोटे बोलतो, चुका करतो, मते मिळवण्यासाठी तरुणांना आणि गरीबांना मूर्ख बनवतो. हे मोदी मान्य करीत नाहीत,’ असे खरगे म्हणाले.

2047ची स्वप्ने, आजच्या समस्यांचे काय – राहुल गांधी

मोदी सरकारच्या अपयशी कारभारावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही जोरदार टीका केली. मोदी सरकारने आता 2025 वर बोलणे बंद केले आहे. ते थेट 2047 ची स्वप्ने विकत आहेत. आज देश कोणत्या गोष्टींना तोंड देत आहे, हे कोण पाहणार, असा सवालही त्यांनी केला.

मोदी सरकारने गेल्या 11 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात हिंदुस्थानची लोकशाही, अर्थव्यवस्था आणि सामाजिक रचनेला मोठा धक्का दिला आहे. हुकूमशाहीची शाई घासण्यात मोदी सरकारने संविधानाचे प्रत्येक पान वाया घालवले आहे!- मल्लिकार्जुन खरगे,काँग्रेस अध्यक्ष