
जवळपास मे महिन्याच्या मध्यापासूनच भाजून काढणारा उन्हाळा गायब होऊन सर्वत्र पर्जन्यधारा बरसू लागल्याने निसर्गसौंदर्य खुलून आले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. तथापि, याच काळात ‘माकडताप’ या जीवघेण्या आजाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे, कोकणात जाताय तर सावधान माकडताप तुमच्या जीवावर उठू शकतो, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सद्य:स्थितीत पाऊस सुरू असल्याने कोकणातील निसर्गरम्य स्थळांना भेट देण्यासाठी हौशी पर्यटक मोठ्या प्रमाणात जात आहेत. सातारा जिल्ह्यातूनही विशेषत: पाटण, जावली आणि महाबळेश्वर येथून जाणार्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच काळात ‘कॅसनूर फॉरेस्ट डिसीज’ अर्थात ‘माकडताप’ या जीवघेण्या आजाराचा धोका वाढला असून, हा आजार गोचिडांमुळे पसरतो आणि तो प्राणघातक ठरू शकतो, असा धोक्याचा इशारा मधुमेहतज्ज्ञ डॉ. विश्वनाथ चव्हाण यांनी दिला आहे.
गेल्या चार वर्षांपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांमध्ये माकडतापाने थैमान घातले असून, वारंवार तापसदृश रुग्ण आढळून येत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि सर्वात गंभीर रक्तस्राव यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या तापावर सध्यातरी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नसून, काळजी घेणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे, असा सल्ला डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.
या उपाययोजना आवश्यक
पूर्ण शरीर झाकणारे लांब बाह्यांचे कपडे घालणे आणि कीटकनाशक स्प्रे वापरणे.
मृत किंवा आजारी माकडांच्या थेट संपर्कात न येणे.
वनक्षेत्रातून किंवा डोंगरातून परत आल्यावर कपडे स्वच्छ धुणे आणि शरीराची तपासणी करणे.
घर आणि परिसरामध्ये स्वच्छता राखणे.