
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील 14 वर्षांपासून रखडलं आहे. दरवर्षी गणपती जवळं आले की, महामार्गाच काम पूर्ण होईल, अशी पोकळं अश्वासन दिली जातात. परंतु प्रत्यक्षात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना कंबरड मोडूनच प्रवास करावा लागतो. यावर्षीही परिस्थिती जैसे थे आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. याचा व्हिडीओ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शेअर करत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) फटकारलं आहे.
मुंबई-गोवा महामर्गावर खड्ड्यांच साम्राज्य निर्माण झालं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई गोवा महार्गाचं विदारक दृश्य दिसत आहे. हा व्हिडीओ एका ट्वीटर वापरकर्त्याने शेअर केला असून हिंदुस्थानातल्या सर्वात श्रीमंत राज्यातील महामार्गाची ही अवस्था असल्याचं त्याने म्हटलं आहे. हाच व्हिडीओ आदित्य ठाकरे यांनी रिपोस्ट केला असून महाराष्ट्रातील अनेक महामार्गांची हीच अवस्था असल्याचं म्हणत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जनसंपर्क बोगस असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
Most National Highways in Maharashtra are in this state. The NHAI PR is bogus. https://t.co/lhDDblzYmn
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 21, 2025
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम 2011 मध्ये सुरू झाले. मात्र 14 वर्षे पूर्ण होऊनही महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले नाही. सध्या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे ठिकठिकाणी खडी रस्त्यावर पसरली आहे. काही खड्डे तर एक फूट खोलीचे आहेत. या खड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झाला आहे.