पाणी तुंबण्याबाबतचे सर्व अडथळे तत्काळ दूर करा, पालिका आयुक्तांनी घेतला पावसाळी उपाययोजनांचा फेरआढावा

मुंबईत मान्सूनही दोन आठवडे आधीच दाखल झाला असला तरी सोमवारप्रमाणे प्रशासनाने बेसावध राहू नये, पावसाळी उपाययोजनांमध्ये परिस्थितीनुरूप सुधारणा करून अधिक वेग द्या, पुन्हा पाणी तुंबणार नाही यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा, पाणी तुंबण्याबाबतचे सर्व अडथळे तत्काळ दूर करा, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महापालिका अधिकाऱयांना दिले.

पालिका आयुक्तांनी आज मुख्यालयात पावसाळय़ातील पालिकेच्या सुसज्जतेचा फेरआढावा घेतला. आयुक्त म्हणाले, पहिल्याच पावसामुळे नाले स्वच्छता, रस्ते व इतर कामांवरदेखील परिणाम झाला. विशेषतः नाल्यांमधून गाळ उपसण्याच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. असे असले तरी पावसाळी कामांचा वेग कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ नये यासाठी आधीच्या नियोजनामध्ये योग्य त्या सुधारणा कराव्यात, नदी-नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण करावीत, असे स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

पाणी तुंबण्याची नवी ठिकाणे का निर्माण झालीत?

पावसाळी पाणी साचणारी नवीन ठिकाणे आढळली आहेत, त्या ठिकाणांची संबंधित प्रशासकीय विभागाचे सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळाचे उपायुक्त यांनी पाहणी करावी. अशी नवीन ठिकाणी का निर्माण झाली त्याची कारणे शोधावीत. त्या ठिकाणांवर करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात, पाणी साचण्याच्या समस्येचे निराकरण करावे, अशी सूचना गगराणी यांनी केली. अपूर्ण राहिलेले रस्ते मास्टिकने पूर्ण करून वाहतूकयोग्य करावेत तसेच 24 तासांच्या आत रस्त्यावरील राडारोडा, रस्तारोधक (बॅरिकेड्स) आणि इतर साहित्य काढून ते गोदामांमध्ये न्यावेत असेही त्यांनी सांगितले.