लाडकी बहीण, शेतकऱ्यांची फसवणूक, या अवकाळी सरकारचा धिक्कार; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेचे आश्वासन, प्रत्येक कुटुंबाला 2 मोफत सिलेंडर निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने यांच्याशी या सरकारला काही देणेघेणे नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी स्थापन झालेल्या या अवकाळी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, अशी टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे टीका केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत की, “महायुती सरकारने निवडणुकीत पैसा फेक, तमाशा देख, हा खेळ खेळाला आहे. निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केलं नाही. त्यावेळी त्यांची भावना महिलांच्या सबलीकरणाची नव्हती, तर केवळ निवडणूक ही त्या मागची भावना होती. यासोबतच त्यांनी शेतकऱ्यांचं कर्जमाफीचंही आश्वासन दिलं होतं, ती देखील त्यांची चूक आहे, असं ते म्हणतील. इतकीच प्रतीक्षा आहे.”

ते म्हणाले की, “लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजनेचे आश्वासन, प्रत्येक कुटुंबाला 2 मोफत सिलेंडर निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने त्यांचे हवाई गुब्बारे होते. आज सर्वसामान्यांचे जे हाल आहेत, शेतकऱ्यांचे जे हाल आहेत, याचं काही देणंघेणं महायुती सरकारला नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे सत्तापिपासू विचारांचं हे अवकाळी सरकार महाराष्ट्रात आहे, याचा आम्ही धिक्कार करतो.”