
खचाखच भरलेल्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मुंब्र्याजवळ बळी गेल्यानंतर मध्य रेल्वेच्या जीवघेण्या प्रवासाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. प्रवाशांचा मृत्यू रेल्वेच्या लेखी कवडीमोल असल्याने मुंब्रा दुर्घटनेची चर्चा चार दिवसांनंतर थंड होईल आणि पुन्हा एकदा रेल्वेच्या नियोजनशून्य कारभाराचा गाडा सुरूच राहील. मुर्दाड रेल्वे अधिकाऱ्यांवर बळी गेलेल्या प्रवाशांचा काही एक परिणाम होणार नाही, असा संताप प्रवासीवर्गातून व्यक्त होत आहे. रेल्वे प्रवास मुंबईकरांची लाइफलाइन असली तरी ती ‘डेथ ‘लाइन बनत असल्याने चाकरमान्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाणे-कसारा, ठाणे-कर्जत मार्गावर गेल्या दहा वर्षांत प्रवाशांची संख्या लाखाने वाढली असली तरी नवीन लोकल फेऱ्यांची संख्या मात्र वाढवण्याचे सोयरसूतक रेल्वेला वाटलेले नाही. त्यामुळे ठाणे-कसारा प्रवास जीवघेणा बनला आहे.
कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरून लोकलने मुंबईकडे रोज 3 लाखांच्या आसपास प्रवासी ये-जा करीत असतात. मात्र कधीच वेळेवर लोकल नसतात. त्यामुळे कायमच ऑफिसला लेटमार्क ठरलेला असतो. रोज काहींना काही तांत्रिक अडचणींमुळे उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. तर लोकल ट्रेनला गर्दी असल्याने अनेक प्रवाशांना दरवाजाला लटकून प्रवास करावा लागत असल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. गेल्या 10/12 वर्षांत प्रवाशांची संख्या वाढूनही एकही कसारा लोकल वाढली नाही. दिवसेंदिवस लोकलला गर्दी वाढत आहे पण लोकल वाढत नसल्याने प्रवासी हैराण आहेत.
पाच महिन्यांत 27 अपघात 17 बळी
मध्य रेल्वेचा कारभार भयंकर ढिसाळ आहे. प्रशासनाला नागरिकांच्या जीवाचे मोल नसल्याने रोज अपघात होत असून प्रवाशांना हकनाक जीव गमवावा लागत आहे. कल्याण-कसारा मार्गावर जानेवारी ते आजपर्यंत 27 अपघात झाले. यामध्ये 17 जणांना जीव गमवावा लागला. गर्दीमुळे बहुतांश अपघात झाले आहेत. प्रवाशांच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडत असल्याचे सांगत रेल्वे प्रशासन हात वर करत आहे
तातडीने हे करता येईल
- कसारा स्थानकातून सकाळी 9 च्या दरम्यान मुंबईसाठी लोकलची संख्या वाढवण्याची गरज आहे. शिवाय काही मेल एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबवल्यास चाकरमान्यांची गैरसोय टळेल.
- टिटवाळा ते कसारा स्थानकाजवळ होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण होते. उड्डाणपूल, पादचारी पूल, ट्रॅकभोवती संरक्षक भिंती उभारल्यास रेल्वे प्रवास सुखकर होईल.
महिला प्रवासी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने महिलांसाठी लोकल डब्यांची संख्या वाढवून प्रत्येक स्थानकावर पोलीस चौकीची गरज. - सकाळी कामाला जायच्या वेळी कल्याण-कसारा रेल्वे मार्गावर लोकल सायडिंगला घेऊन मेल एक्स्प्रेस पुढे काढल्या जातात. यावर नियंत्रण गरजेचे.
- एक्स्प्रेस/मालगाडीच्या इंजिनात बिघाड होणे, रेल्वे रूळ तुटणे, गाड्या रुळावर घसरणे, सिग्नल बिघाड या तांत्रिक अडचणी कमी होण्याची गरज.
रेल्वेने अपघाताच्या घटनेचे तरी कसारा, कर्जत मार्गावर लोकल ट्रेन वाढवाव्यात. महत्त्वाचे म्हणजे मेल, एक्स्प्रेस पुढे न काढता लोकल ट्रेन वेळेवर चालवाव्यात. अन्यथा सर्वच प्रवासी संघटना रेल रोको आंदोलन करतील याची रेल्वेमंत्री आणि मध्य रेल्वे प्रशासनाने नोंद घ्यावी. राजेश घनघाव, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना
तिसरा मार्ग ‘दिवास्वप्न ?
मेल एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्ग असावा म्हणून कल्याण-कसारा तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यात आले. पण ते फारच संथ गतीने सुरू असल्याने हा तिसरा मार्ग प्रत्यक्षात होणार की ते ‘दिवास्वप्न’ ठरणार, अशी शंका प्रवाशांना आहे. तिसऱ्या ट्रॅकअभावी मेल, एक्स्प्रेस व लोकल एकाच मार्गावरून ये-जा करत असल्याने लोकल रोजच लेट होतात आणि याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागतो.