
गिरणी कामगारांनी एकजुटीने घरांसाठी लढा दिला. गिरणी कामगार आणि वारसदारांना मुंबईबाहेर फेकण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा डाव असून हे कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. गिरणी कामगार आणि वारसांना मुंबईतच घरे द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आज गिरणी कामगार एकजुटीने केंद्र आणि राज्य सरकारला दिला. भारत माता सिनेमा, लालबाग येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
एनटीसीच्या कामगारांचा थकलेला पगारही सरकारने द्यावा अशी मागणी कामगार संघटनांनी केली. कामगारांच्या घराविरोधातले धोरण अजिबात मान्य नाही, अशी भूमिका गिरणी कामगार सेनेच्या नेत्यांनी घेतली. या वेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे यांनी मार्गदर्शन केले. गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उबे, बाळ खवणेकर, हरिनाथ तिवारी, कॉ. बी. के. आंब्रे, बबन मोरे, हेमन धाका, हेमंत गोसावी, रमाकांत बने उपस्थित होते.