‘ आता लग्नाचीही बनवाबनवी ! फसवणूक प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल

लग्नाचे वय – उलटूनही लग्नासाठी मुलगीच मिळत नाही, याचाच – गैरफायदा घेऊन लग्नाचा बनाव रचून लूटमार करण्याचा नवा उद्योग भामट्यांनी सुरू केला आहे. या टोळीने आता पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीने खेड तालुक्यातील शेतकऱ्याची 1 लाख 20 हजारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. वरपिता आनंद सयाजी जैद (वय ६०, रा. जैदवाडी, ता. खेड) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी ज्योती संतोष 7 तांबोळी (वय ४०, रा. वडगाव सहाणी, ता. जुन्नर) या महिलेने मध्यस्थी केली होती. वधू सुवर्णा उत्तम – गव्हाणे (वय २८, रा. उमरगा, जि. धाराशिव), सुवर्णाची मामी अनसूया राजेंद्र मोरे (वय ५०, रा. उमरगा, जि. धाराशिव) सुवर्णाची मावशी – मनीषा बाळू कदम (वय ४५, रा. यशवंत कॉलनी, निलंगा, लातूर) आणि ज्योती तांबोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जैदवाडी येथे सुवर्णा आणि संतोषचे घाईघाईने लग्न लावून देण्यात आले. लग्नाचा बार उडताच वधू मुलीने चक्क पोबारा केला. या घटनेमुळे ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे उघडकीस आले आहे. आंबेगाव तालुक्यातील भराडी या गावात असे बनवाबनवीचे दोन गुन्हे २०२१ साली उघडकीस आले. या टोळीला जेरबंद केल्यानंतर आळेगाव फाटा येथील आणखी एक गुन्हा उघडकीस आला. लग्नाचं वय झालंय; पण लग्न जमत नाही, ही चिंता आता घरोघरी मुलांच्या आई-वडिलांना भेडसावत आहे. मुलींचा घटता जन्मदर आणि भ्रूणहत्या या ज्वलंत विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या महिन्यात सोलापुरात विवाहेच्छुक तरुणांनी चक्क मुंडावळ्या बांधून आणि वाग्दत्त वराच्या वेशभूषेत घोड्यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाच काढला. लग्नानंतर अवघ्या आठ दिवसांतच नवरदेवाच्या वडिलांकडून लग्नासाठी घेतलेले १ लाख ३० हजार आणि नववधूचे दागिने घेऊन पसार होण्याच्या तयारीतील टोळीला मंचर पोलिसांनी ७ एप्रिल २०२१ रोजी जेरबंद केले.

आंबेगाव तालुक्यातील भराडी येथे ही घटना घडली. शीतल रमेश खुडे असे नववधूचे नाव आहे. तिचे खरे नाव यास्मिन अन्वर बेग (रा. डी. बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे) असे आहे. शीतलबरोबरच तिचे साथीदार लता अविनाश कोटलवार, मनोज अविनाश कोटलवार (सध्या रा. आळंदी), गणपत वाळुंज यांना अटक करण्यात आली आहे. वसंत किसन थोरात (रा. मंचर, ता. आंबेगाव), वैशाली मोरे (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश खंडू बांगर (रा. भराडी, आंबेगाव, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. २४ मार्च २०२१ रोजी ही घटना घडली.

वधू पित्यालाच द्यावा लागतो हुंडा
वधू पित्याकडून हुंडा घेण्याचे दिवस आता मागे पडले. उलट मुलगी मिळावी म्हणून वधू पित्यालाच तो मागेल तेवढी रक्कम आता द्यावी लागत आहे. या टोळीतील आरोपींचा हाच पूर्णवेळ उद्योग आहे. मिळालेले पैसे मौजमजा करण्यासाठी वापरतात, असे निष्पन्न झाले होते.

विधुर शेतकऱ्यालाही गंडा
शेतकऱ्याचा पुनर्विवाह करून देण्याच्या बतावणीने या टोळीने गंडा घातल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आळेफाटा येथील बाळू महादू घंगाळे या ६४ वर्षीय शेतकऱ्याने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. कोरोनात पत्नीचे निधन झाले. मुलगा विकास हा डोंबिवलीत राहतो. पत्नीच्या निधनामुळे घंगाळे यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. मध्यस्थांच्या सांगण्यावरून लता कोटवार हिची भेट घेतली. २८ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी विवाह केला. मध्यस्थी करणाऱ्या रुक्मिणी चव्हाण हिने मागितलेले १ लाख रुपये रोख घंगाळे यांनी दिले.