
राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्या अन् पालख्यांचा सोहळा सोलापूर जिह्याच्या वेशीवर विसावला असून पंढरीनगरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेली आहे. चंद्रभागा नदीचे स्नान करून भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे. एका मिनिटामध्ये तीस भाविकांना पदस्पर्श दर्शन दिले जात असल्याने दिवसभरात चाळीस हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन आणि साठ हजार भाविकांना मुखदर्शन असा एक लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे. आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मठ, धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत.