पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे; कोल्हापूर जिल्ह्यातील 63 बंधारे पाण्याखाली

(छाया : संजय साळवी)

कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाने किंचित उघडीप घेतली असली, तरी धरण पाणलोटक्षेत्रात सुरू असलेला जोरदार पाऊस आणि धरणातील विसर्गामुळे नद्या, ओढ्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना दिसत आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत चार फुटांची वाढ झाली असून, सायंकाळी सहाच्या सुमारास ३४ फूट ७ इंच झाली होती. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट, तर धोका पातळी ४३ फूट आहे. सायंकाळपर्यंत ६३ बंधारे पाण्याखाली गेले होते.

राधानगरी धरण ६५ टक्के भरले असून, धरणातून अजूनही विद्युतगृहातून तीन हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी ५८ टक्के भरले असून, ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा ६२ टक्के (विसर्ग १ हजार ७३० क्युसेक), दूधगंगा ४० टक्के (विसर्ग १ हजार ६०० क्युसेक), कासारी ४८ टक्के (विसर्ग ३०० क्युसेक), कडवी ६१ टक्के (विसर्ग २२० क्युसेक), कुंभी ६० टक्के (विसर्ग ३०० क्युसेक), पाटगाव ६५ टक्के, चिकोत्रा ५३ टक्के, चित्री ६७ टक्के, जंगमहट्टी ७४ टक्के, घटप्रभा १०० टक्के (विसर्ग ४ हजार ६६५क्युसेक), जांबरे १०० टक्के (विसर्ग ६६० क्युसेक), आंबेओहोळ ८४ टक्के, सर्पनाला ७९ टक्के (विसर्ग १५६ क्युसेक), धामणी ६८ टक्के (विसर्ग १ हजार २२१ क्युसेक) आणि कोदेलपा १०० टक्के भरले असून, ६३४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर शहरालगत असलेला कळंबा तलाव बुधवारी ओव्हरफ्लो झाला.