
पंढरपूरला निघणाऱया आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. परंपरेप्रमाणे वारीचा मार्ग ठरलेला आहे, परंतु अनेकदा त्या मार्गावरून व्हीआयपींचे ताफे गेले तर वारकऱ्यांना अडचण होते. त्यामुळे यावेळी पंढरीच्या वारी मार्गावर व्हीआयपी गाड्यांना नो एण्ट्री केली जाणार आहे.
यंदा 26 जून ते 16 जुलैदरम्यान आषाढी वारी आहे. आषाढी वारीसाठी वारकऱयांच्या सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला. यावेळी वारीसाठी जाणाऱया वाहनांना टोलमध्ये सवलत देण्याप्रमाणेच सर्व मानाच्या पालख्या आणि वारकऱ्यांना फिरती शौचालये, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱयांनी योग्य नियोजन करावे असे निर्देश बैठकीत देण्यात आले. या बैठकीला पंढरपूर देवस्थान समितीचे प्रमुख गहिनी महाराज औसेकर, विविध संत संस्थानांचे पदाधिकारी तसेच अध्यात्मिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
असे होणार काम
वारीच्या मुक्कामस्थळी मुबलक पाणी, विजेची जोडणी, वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ठिकाणी रिंगण होते त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. वाखरी येथे एक मॉडेल वारीतळ विकसित केला जाणार असून, यंदा रेल्वेच्या 65 एकर जागेचा समावेश झाल्याने वारकऱयांना मोठा दिलासा मिळणार आहे. विविध ठिकाणी स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या अॅम्ब्युलन्ससोबत कार्डियाक अॅम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये याबाबत निर्देश देण्यात आले.