
राजेश प्रधान, पेण
प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीच्या गणेशमूर्तीवर घातलेली बंदी उच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे बाप्पाच्या मूर्तीची पंढरी अशी ओळख असलेल्या पेणमधील कारखानदारांवरील ‘विघ्न’च टळले असून मूर्ती बनवण्यासाठी शहरासह तालुक्यातील कलाकेंद्रांमध्ये युद्धपातळीवर लगबग सुरू झाली आहे. ही बंदी उठल्याने या उद्योगात तब्बल 300 कोटींची उलाढाल होणार आहे.
पेण तालुक्यात गणेशमूर्ती निर्मितीचे सुमारे 1600 कारखाने आहेत. पेण शहरासह तालुक्यातील हमरापूर, जोहे, कळवा, तांबडशेत, बोरगाव, शिर्की, बोरी, वढाव, अंबेगावसह अनेक गावांमध्ये गणेशमूर्तीचे छोटे-मोठे कारखाने आहेत. बोलके डोळे, सर्वांगसुंदर मूर्ती व आकर्षक रंगसंगतीमुळे पेण तालुक्यातील गणेशमूर्तीना देशातील विविध राज्यांसह परदेशातही मोठ्या प्रमाणात मागणी असते. सदर मागणी पूर्ण करण्याकरिता गणेशमूर्ती बनवण्याचे काम पेण तालुक्यात वर्षभर सुरू असते. यावर्षी मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी गणेशमूर्तीवर बंदी घातल्याने गणेशमूर्ती उद्योगावर मोठे संकट आले होते. पीओपी मूर्ती बंदी काळात गणपती कारखानदारांनी अधिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने पीओपीच्या कमी गणेशमूर्ती तयार केल्या त्यामुळे उत्पादनात 50 टक्के घट आली आहे. परंतु बंदी उठल्यानंतर भाविकांना गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याकरिता कारखानदारांनी कंबर कसली आहे. मूर्तीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले असून यावर्षीही 300 कोटींची उलाढाल या उद्योगातून होणार आहे, अशी माहिती गणेश मूर्तिकार संघ उत्कर्ष मंडळ हमरापूर विभागाचे अध्यक्ष जयेश पाटील यांनी दिली.
अवकाळी पावसाचाही फटका
पेण तालुक्यातून सुमारे 20 ते 22 लाख पीओपी गणेशमूर्ती दरवर्षी तयार होतात परंतु यावर्षी बंदीमुळे आतापर्यंत केवळ 15 लाख मूर्ती तयार झाल्या आहेत. तसेच शाडू मातीच्या 15 ते 18 लाख मूर्ती तयार झाल्या आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळेही मूर्ती उत्पादनात फटका बसल्याचे कारखानदारांनी सांगितले.
पेण तालुक्यातील बोरघर येथे प्रख्यात गणेश मूर्तिकार अविनाश भोईर बाप्पाच्या रंगकलेत गढून गेले आहेत. त्यांच्या कारखान्यातून 300 हुन अधिक गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. तर 5 हजार मूर्ती विक्रीसाठी तयार आहेत. पीओपीवरील बंदी उठल्याने गणेशमूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाल्याची प्रतिक्रिया अविनाश भोईर यांनी दिली.
शाडूच्या मूर्ती साकारण्यात अडचणी
शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांची संख्या कमी आहे. एक कारागीर शाडू मातीची मूर्ती दिवसाला केवळ दोनच बनवतो. तसेच मूर्ती ओली असताना त्यावर दागिन्यांचे कोरीव काम करावे लागते. ठिसूळ वजनाला जास्त असल्याने मातीच्या मूर्तीची वाहतूक करणे कठीण असते. यावर्षी गणेशोत्सव 20 दिवस अगोदर म्हणजे 27 ऑगस्टला असल्याने कमी वेळेत जास्त श्रींच्या मूर्ती तयार करून भाविकांची मागणी पूर्ण करणार असल्याची माहिती दीपक कला केंद्राचे मालक नीलेश समेळ यांनी दिली.