यूपीएससीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; पीजी आणि हॉस्टेलवाले लुटत असल्याचा सुसाईड नोटमधून आरोप

यूपीएससीची तयारी करणाऱया तीन विद्यार्थ्यांचा दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी घुसल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच यूपीएससीच्या तयारीसाठी महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या तरुणीने हॉस्टेलमध्येच आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आई-बाबा मला माफ करा, असे पत्र लिहीत अकोल्याच्या तरुणीने दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये हॉस्टेलमध्ये आत्महत्या केली. अंजली गोपनारायण असे या तरुणीचे नाव असून तिला तीनवेळा अपयश आल्याने आणि खर्च वाढत चालल्याच्या नैराश्यातून तिने जीवन संपवले. दरम्यान, केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर आता चोहोबाजूंनी टीका होत आहे.

पीजी आणि हॉस्टेलवाले आम्हाला लुटत आहेत. विद्यार्थी हे सहन करू शकत नाही, अशा अनेक संकटांचा तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. यूपीएससीची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव आहे. हॉस्टेलवाले फक्त लुटत आहेत. अभ्यास करताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आत्महत्या करणे हा काही त्यावरचा उपाय नाही. तरीही मी मृत्यूला कवटाळत आहे. सरकारी नोकऱयांमध्ये पारदर्शकता आणि नोकऱया निर्माण करण्याचा सल्लाही तिने पत्रातून दिला आहे. दरम्यान, अंजलीचे वडील महाराष्ट्र पोलिस दलात सहाय्यक सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. 21 जुलै रोजी तिने आत्महत्या केली.

मनमानी फीवाढीवर अंकुश हवा

अंजलीने पीजी आणि हॉस्टेलच्या मनमानी फीवाढीवर अंकुश लावण्याची मागणीही पत्रातून केली आहे. मृत्यूनंतर माझे अवयव दान करावेत, अशी इच्छा तिने आपल्या आईवडिलांना उद्देशून व्यक्त केली आहे.