
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने खूनाच्या एका प्रकरणात दोषी ठरवलेल्या व्यक्तीची जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली आहे. कारण या व्यक्तीने 10 वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवला आहे. न्यायालयाने आरोपीला हिंसेच्या विचाराला प्रत्युत्तर म्हणून 10 कडुलिंबाची झाडे लावण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती आनंद पाठक आणि न्यायमूर्ती पुष्पेंद्र यादव यांच्या खंडपीठाने म्हटले की हे निर्देश एका उपक्रमाचा भाग आहेत, ज्यामुळे “निसर्गाशी सर्जनशीलता आणि सामंजस्याच्या माध्यमातून हिंसा व दुष्टतेच्या विचाराला तोंड देता येईल.” न्यायालयाने नमूद केले की सध्या, करुणा, सेवा, प्रेम आणि दया यांसारख्या गुणांचा मानवी अस्तित्वाच्या आवश्यक घटक म्हणून विकास होणे गरजेचे आहे. हा प्रयत्न फक्त एक झाड लावण्याबाबत नाही, तर एका विचाराचे बीज पेरण्याबाबत आहे असे खंडपीठाने म्हटले आहे.
महेश शर्मा यांच्या त्या याचिकेवर सुनावणी करत होती, ज्यात त्यांनी 2021 मधील कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले होते. त्या आदेशात त्यांना खूनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांनी शिक्षेची स्थगिती आणि जामीन मागितला होता.
न्यायालयाने सांगितले की, जर अर्जकर्त्याने 50 हजार रुपयांची जातमुचलका आणि त्याच रकमेचे दोन सक्षम जामीन सादर केले आणि बोलावल्यावर उच्च न्यायालयाच्या प्रधान निबंधकांसमोर हजर राहण्याचे वचन दिले, तर त्याला जामिनावर मुक्त करण्यात येईल.
न्यायालयाने अर्दजाराला 10 झाडे, फळझाडे, कडुलिंब किंवा पिंपळाची झाडे लावण्याचा आदेश दिला आणि सांगितले की त्या झाडांची देखभाल करण्याची जबाबदारी अर्जदाराची असेल. न्यायालयाने त्याला सुटकेच्या 30 दिवसांच्या आत झाडांच्या छायाचित्रांचा पुरावा सादर करण्यास सांगितले. न्यायालयाने असेही नमूद केले की अर्जदाराने विशेषतः 3-4 फूट खोल खड्ड्यात 6-8 फूट उंचीची रोपे लावली पाहिजेत, जेणेकरून ती लवकरात लवकर वृक्ष म्हणून वाढू शकतील.