
>> प्रसाद ताम्हनकर
सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (एनटीयू) ने आशिया, युरोप, अमेरिका आणि आफ्रिका प्रदेशातील किनारी प्रदेशाजवळ वसलेल्या 48 शहरांचा अभ्यास केला आहे. या 48 शहरांची नोंद त्यांनी बुडणारी शहरे म्हणून केली आहे. 16 कोटी लोक या भागात राहतात. समुद्राची वाढत चाललेली पातळी ही या शहरांसाठी मोठा धोका निर्माण करू लागली आहे. हवामानात सतत होत असलेले बदल हे या मागचे प्रमुख कारण आहे. या 48 शहरांच्या यादीत हिंदुस्थानातील अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई अशा प्रमुख महानगरांचादेखील समावेश आहे. बीबीसीने यासंदर्भात विशेष अहवाल प्रकाशित केला आहे.
नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार 2014 ते 2020 या काळात चेन्नईमधील काही भागांतील जमीन ही दरवर्षी 0.01 सेमी ते 3.7 सेमी या वेगाने बुडत आहे. या भागात 1.4 दशलक्ष लोक निवास करतात. या अभ्यासात असेदेखील नमूद करण्यात आले आहे की, थरामणी हे चेन्नईतील सर्वात जास्त वेगाने खचणारे क्षेत्र आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अभ्यासानुसार समुद्राच्या पातळीत 2024 मध्ये 0.59 सेंटिमीटरने वाढ झाली असून दरवर्षी येथील जमीन 3.7 सेंटिमीटर अशा वेगाने बुडत चालली आहे.
दुसरीकडे 2014 ते 2020 या कालावधीत अहमदाबादच्या काही भागांतील जमीन ही 0.01 सेंटिमीटर ते 5.1 सेंटिमीटर अशा वेगाने बुडाली आहे. इथे 51 लाख लोकांची वस्ती आहे. पिपलाज हे अहमदाबादमधील सर्वात वेगाने बुडत चाललेले क्षेत्र आहे. इथे दरवर्षी 4.2 सेंटिमीटरने जमीन बुडते आहे. नासाच्या मते इथेदेखील समुद्राची पातळी 0.59 सेंटिमीटर इतकी वाढलेली आहे. पंपिंगद्वारे भूजलाचा प्रचंड उपसा, अतिवृष्टी आणि समुद्र पातळीत वाढ ही या संकटामागची प्रमुख कारणे आहे. त्यावर वेळीच उपाय न शोधल्यास शहराला भविष्यात पुराचा सामनादेखील करावा लागणार आहे.
2014 ते 2020 च्या कालावधीत कोलकातामधील काही भागातील जमीन ही 0.1 सेंटिमीटर ते 2.8 सेंटिमीटर अशा वेगाने बुडाली आहे. या भागात अंदाजे 90 लाख लोक राहतात. शहरातील सर्वात वेगाने बुडणारा भाग भाटपारा असून इथली जमीन दरवर्षी 2.6 सेंटिमीटर वेगाने बुडते आहे. इथल्या समुद्र पातळीतदेखील 0.50 सेंटिमीटर वाढ आढळलेली आहे. इतर दोन्ही शहरांप्रमाणे भूजलचा अतिरिक्त उपसा हे जमीन खचण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. या संकटामुळे शहराला पुरासोबत भूकंपाचादेखील धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. या प्रमुख तीन शहरांसह मुंबई आणि सुरत या शहरांचादेखील यादीत समावेश आहे. सध्या या सर्व शहरांतील महानगरपालिका भूजल व्यवस्थापन सुधारण्यासाठी आराखडा बनवत आहेत. हवामानाला अनुकूल असे शहराचे कृती आराखडे असतील याची काळजी घेतली जाणार आहे.
बुडणाऱ्या शहरांना वाचवायला अनेक उपाय योजण्याचे नियोजन होत असले तरी नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात देण्यात आलेल्या एका प्रमुख कारणाकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. या अभ्यासात नमूद केल्यानुसार बुडणाऱ्या शहरांपैकी अनेक शहरे ही आशिया आणि आग्नेय आशियात आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे इथली लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे शहरांची वाढदेखील जोमाने होत आहे. वाढत्या लोकसंख्येला आणि त्यांच्यासाठी उभ्या करण्यात येत असलेल्या सोयीसुविधांना पाण्याची प्रचंड मोठी गरज निर्माण होत आहे. त्यासाठी पाण्याचा अतिरेकी वापर केला जात आहे आणि विशेषतः भूगर्भातील पाण्याच्या साठय़ाला त्यामुळे सर्वात जास्ती धोका निर्माण झालेला आहे.
मानवाचा हव्यास त्याला किती खोलात घेऊन चालला आहे हे या अभ्यासामुळे गेली काही वर्षे जी भीती संशोधक व्यक्त करत होते, ती आता सत्यात उतरू लागली आहे.