नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या! प्रकल्पग्रस्तांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत राज्य सरकारने पेंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली. विमानतळाच्या नामकरणासाठी केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असूनही दिबांच्या नावाची घोषणा न झाल्यामुळे भूमिपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, अतुल पाटील, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह पदाधिकाऱयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.