
>>चंद्रकांत पालकर: पुणे
खडकवासला धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला आहे.
View this post on Instagram
आज सकाळी १० वाजता हा विसर्ग ३५,३१० क्युसेकवरून ३९,१३८ क्युसेक इतका करण्यात आला आहे. या वाढीव विसर्गामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
खडकवासला धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी, धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. #PuneRains #Pune pic.twitter.com/qnPo4qIPQB
— Saamana Online (@SaamanaOnline) August 20, 2025
या संदर्भात मुठा कालवे पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता श्री. मोहन भदाणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि पाण्याची येवा लक्षात घेऊन विसर्गात पुन्हा बदल केला जाऊ शकतो. आवश्यकतेनुसार हा विसर्ग कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे.”
या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना, विशेषतः डेक्कन, शिवाजीनगर आणि इतर सखल भागांतील रहिवाशांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावावीत आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.