अजित पवारांना विनंती, कोकाटेंना घरी बसवा, काय बोलायचं त्यांना अजिबात कळत नाही – रोहित पवार

“अजित पवार यांना मी विनंती करतो की, माणिकराव कोकाटे नावाचे जे मंत्री आहेत, त्यांना कृपा करून घरी बसावा. काय बोलायचं, कुठं बोलायचं त्यांना अजिबात काळात नाही. दररोज नवीन कोट कसे घालायचे हे त्यांना माहित आहे. पण शेतकऱ्यांचा फटका सदरा त्यांना दिसत नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे. ती अजितदादांनी मला दिली, असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. यावरच पुण्यात आयोजित पत्रकार परिषद रोहित पवार यांनी टीका केली आहे.

याशिवाय X वर एक पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “कृषि विभागात सध्या काम कमी आणि केवळ बडबड जास्त असा प्रकार सुरुय. कृषि खातं ही ओसाड गावची पाटीलकी आहे’’ असं या खात्याचे खुद्द मंत्री माणिकराव कोकाटे हेच म्हणत असतील तर इच्छा नसताना त्यांनी ही फुकटची पाटीलकी करु नये.”

ते म्हणाले की, सरकारनेही त्यांना मंत्रीपदावरून दूर करून माणुसकी आणि संवेदनेचे धडे आधी द्यावेत. कृषि मंत्रीपदाच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यासाठी सेवा करण्याची संधी कार्यक्षम आणि संवेदनशील व्यक्तीकडं सोपवावी. यामुळं किमान शेतकऱ्याला न्याय तरी मिळेल. मुख्यमंत्री आणि अजित पावर यांनी यावर निर्णय घ्यावा.”