भाजप-संघाच्या द्वेषपूर्ण आणि मनुवादी विचारसरणीने समाजात विष पसरवले आहे, आयपीएस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी राहुल गांधी यांची टीका

जातीयवादावला कंटाळून हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांनी आत्महत्या केली होती. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका केली आहे. भाजप आणि संघाच्या द्वेषपूर्ण आणि मनुवादी विचारसरणीने समाजात विष पसरवले आहे असे विधान राहुल गांधी यांनी केले आहे.

एक्सवर पोस्ट करून राहुल गांधी म्हणाले की, हरयाणाचे आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांचे आत्महत्या प्रकरण हे त्या वाढत्या सामाजिक विषाचे प्रतीक आहे, जे जातीनुसार माणुसकीचा गळा घोटत आहे.

जेव्हा एका आयपीएस अधिकाऱ्यालाच त्याच्या जातिमुळे अपमान आणि अत्याचार सहन करावे लागतात तेव्हा विचार करा, सामान्य दलित नागरिक कोणत्या परिस्थितीत जगत असतील?

रायबरेलीतील हरिओम वाल्मीकि यांच्या हत्येपासून, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचा झालेला अपमान आणि आता पूरनजी यांचा मृत्यू या घटना दाखवतात की वंचित वर्गावर होणारा अन्याय आता आपल्या परमोच्च टप्प्यावर पोहोचला आहे.

भाजप आणि संघाच्या द्वेषपूर्ण आणि मनुवादी विचारसरणीने समाजात विष पसरवले आहे. दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज आज न्यायाची आशा हरवू लागला आहे. हा संघर्ष केवळ पूरणजी यांचा नाही तर त्या प्रत्येक भारतीयाचा आहे जो संविधान, समानता आणि न्यायावर विश्वास ठेवतो असेही राहुल गांधी म्हणाले.