दरड कोसळताच रायगडातील 90 गावांत सायरन वाजणार, जिल्ह्यातील 392 गावांना पावसाळ्यात धाक्याचा अलर्ट

नियम धाब्यावर बसवून पोखरण्यात येणारे डोंगर.. बेसुमार वृक्षतोड.. यामुळे रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त गावांची संख्या 103 वरून तब्बल 392 पर्यंत वाढली आहे. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने अॅक्शन प्लॅन तयार केला असून दरड कोसळताच रायगडातील 90 गावांत सायरन अलर्ट वाजणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांना वेळीच सुरक्षितस्थळी धाव घेण्यास मदत होणार असल्याने जीवितहानी टाळण्यास मदत होणार आहे. तसेच दुर्घटना घडताच नागरिकांना तत्काळ मदत करता यावी याकरिता महाडमध्ये 23 जवानांचे एनडीआरएफचे पथक तैनात केले आहे.

रायगड जिल्ह्यात मागील काही वर्षांत झालेल्या भूस्खलनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने दरडीच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी तयारी केली आहे. दरडींपासून धोका असलेल्या गावांची पाच गटांत वर्गवारी करण्यात आली असून वर्ग एक अर्थात सर्वाधिक धोका असलेली 18 गावे आहेत. वर्ग दोनमध्ये 71. वर्ग तीनमध्ये 159, वर्ग चारमध्ये 49 आणि वर्ग पाचमध्ये 73 अशा एकूण 392 गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील वर्ग एक व दोन अशा धोकादायक असणाऱ्या गावांना संपर्कासाठी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली देण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाचवेळी या ठिकाणी हवामान पूर्वसूचना प्रसारित करण्यात येणार आहेत. तसेच आपत्ती काळात थेट संदेश प्रसारित होणार आहे. धोकादायक ठिकाणी सायरनची व्यवस्था करण्यात आली असून या प्रणालीसाठी इन्व्हर्टर बॅटरीही देण्यात आल्या आहेत.

यापूर्वी घडलेल्या दुर्घटना
26 जुलै 2005 मध्ये महाड तालुक्यातील दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते, अप्पर तुडील या गांवांसह पोलादपूर तालुक्यातील कुडपण, कोंढवी, कोतवाल या गावांमध्ये दरडी कोसळण्याची घटना घडली होती. यामध्ये जवळपास 300 जणांचा मृत्यू झाला होता. तर 22 जून 2015 रोजी नेरळ मोहाची वाडी येथे दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. 21 व 22 जुलै 2021 रोजी महाड येथे तळीये गावात दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला. पोलादपूर तालुक्यातील केवनाळे येथे भूस्खलन होऊन 5 जण दगावले. तर साखर सुतारवाडी येथील दरड दुर्घटनेत 6 जणांचा जीव गेला. तीन वेगवेगळ्या दुर्घटनांत एकूण 95 जणांचा बळी गेला. 28 जण जखमी झाले. याशिवाय आंबेमाची, हिरकणी वाडी, मोहोत, वाघेरी, सवाद, माटवण, डाभीळ येथील शेकडो कुटुंबे विस्थापित झाल्याची दुर्घटना घडली होती.

आपत्ती व्यवस्थापन किट
धोका असणाऱ्या गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन किट पाठवले आहेत. किटमध्ये 30 हून अधिक वस्तू असणारी तरंगणारी प्रथमोपचार पेटी आहे. सीपीआर मास्क, बँडेज, नेक बेल्ट, सेफ्टी गांगल, टॉर्च, शोध व बचाव दिवा, टूल किट, वेगवेगळे दोरखंड, हेल्मेट, ग्लोज, लाइफ जॅकेट, गम बूट, तरंगणारे व फोल्डिंग स्ट्रेचरचा समावेश आहे.

एनडीआरएफ जवानांचे पथक
महाडमध्ये 23 जवानांचे एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. महाड नगर परिषदेच्या दस्तुरी नाक्यावरील रमा विहारमध्ये कॅम्प लावला आहे. या पथकाकडे अद्ययावत उपकरणांसह चार फायबर होडी, वायरलेस सेट, अन्य सामग्रीचा समावेश आहे.

अतिधोकादायक गावात ‘पीए सिस्टम’ म्हणजे सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली बसवण्यात आली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षातून एकाच वेळी 21 ठिकाणी हवामान विषयक पूर्व सूचना देण्यात येतील. लाईव्ह अथवा रेकॉर्डेड संदेश देता येईल. या ठिकाणी सायरन वाजवला जाणार आहे.
सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड