दीडशे वेळा चेन खेचली; ‘मरे’ कोलमडली, रेल्वेची साखळी ओढण्याचे प्रकार 53 टक्क्यांनी वाढले

आधीच या-ना-त्या कारणामुळे विलंबाने धावणाऱ्या मध्य रेल्वे सध्या साखळी खेचण्याच्या प्रकारांमुळे हैराण झाली आहे. प्रवासी छोट्या-छोट्या कारणांवरूनही साखळी खेचत असून मागील 20 दिवसांत तब्बल 150 वेळा लोकल आणि एक्सप्रेसच्या साखळी खेचण्याचे प्रकार घडले. अशा प्रकारांमुळे गाड्यांचे वेळापत्रक वारंवार कोलमडत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साखळी खेचण्याच्या घटनांमध्ये 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीची मदत मिळवण्यासाठी लोकल आणि मेल/एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये साखळीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अनेकदा प्रवासी छोट्या-छोट्या कारणांमुळे तसेच काहीजण मजेखातर साखळी खेचत असल्याचे निदर्शनास येत आहे. 1 ते 19 जून या कलावधीत मध्य रेल्वेवर 150 गाड्यांची साखळी खेचल्याचे प्रकार घडले. संबंधित गाडी सुरक्षेच्या कारणास्तव थांबवली जाते. त्यामुळे त्या मार्गावरील संपूर्ण वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे.

विशिष्ट धोक्याची सूचना मोटरमनपर्यंत पोचवून गाडी थांबविण्यासाठी साखळीची व्यवस्था केली आहे. मात्र या सुविधेचा गैरवापर वाढल्याने रेल्वे प्रशासन हैराण झाले आहे. गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारून प्रकारांना आळा घालण्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित प्रवाशांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत. निष्कारण साखळी खेचल्याच्या प्रकारामुळे त्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीला जवळपास दहा ते पंधरा मिनिटे विलंब होत असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मागील 20 दिवसांत 150 गाड्यांमध्ये साखळी खेचण्याचे प्रकार घडले. गेल्यावर्षी याच कालावधीत 98 गाड्यांमध्ये साखळी खेचण्याचे प्रकार घडले. यावरून गेल्यावर्षीच्या तुलनेत या घटनांमध्ये 53 टक्क्यांची वाढ झाल्याचे उघडकीस आले आहे.