
राज्य सरकारने पहिली ते चौथी हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. ट्वीटरवर पोस्ट करत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या निर्णयाचे रद्द झाल्याचे स्वागत करत महायुती सरकारला फटकारले आहे.
हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे, पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन, असेही राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे.