
मे महिन्यात कोसळलेला अवकाळी पाऊस आणि मान्सूनच्या झालेल्या जोरदार सुरुवातीमुळे रायगड जिल्ह्यातील धरणे भरू लागली आहेत. धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने पाणीटंचाई मिटली आहे. सुतारवाडी धरण पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागले आहे. पाभरे, भिलवले या दोन धरणांमध्ये 95 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला असून 6 धरणांमध्ये 50 टक्क्यांहून जास्त पाणी जमा आहे. 19 धरणांमध्ये मात्र अद्याप 50 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाच्या सरी बरसत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील धरण क्षेत्रात 6 हजार 325 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाने सरासरी गाठली नसली तरी जिल्ह्यातील लघु पाठबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या 28 धरणांमधील पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ही एक समाधानाची बाब आहे. अवकाळी आणि मान्सूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे धरणांसह विहिरी, विंधन विहिरींमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई जवळपास संपुष्टात आली आहे. मे महिन्याच्या मध्यंतर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 273 गावे, वाड्यांना 37 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत होता. सद्यस्थितीत जिल्ह्यातील केवळ 7 गावे, वाड्यांना 6 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस
रायगड जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. सुतारवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाभरे आणि भिलवले धरणात 95 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साचले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर ही दोन्ही धरणे ओसंडून वाहणार आहेत. फणसाड, वावा, कार्ले, कुडकी, संदेरी, अवसरे या धरणांतील पाणीसाठा 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आंबेघर, श्रीगाव, कोडगांव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, रानीवली, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, साळोख, कलोते-मोकाशी, डोणवत, मोरबे, बामणोली, उसरण, पुनाडे ही धरणे मात्र अद्यापपर्यंत 50 टक्केही भरलेली नाहीत. या धरणांची पाणी साठवण्याची क्षमता इतर धरणांपेक्षा फार मोठी आहे.