Ratnagiri News – हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या परिपत्रकाची रत्नागिरीत होळी, शिवसेनेचे जोरदार आंदोलन

हिंदी सक्तीच्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया, पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध असो अशा जोरदार घोषणा देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राज्य सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या परिपत्रकाची होळी केली.

राज्य सरकारने पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती विरोधात आंदोलन छेडले. राज्य सरकारच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत निषेध केला. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याचे परिपत्रक 16 एप्रिल 2025 रोजी काढले होते. त्या परिपत्रकाची शिवसैनिकांनी होळी केली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हासंपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, जिल्हा संघटक संतोष थेराडे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, रवींद्र डोळस, लोकसभा मतदारसंघ महिला संपर्क संघटक नेहा माने, महिला आघाडी जिल्हा संघटक वेदा फडके, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, सुरेश करंबळे, बंड्या बोरूकर, कमलाकर कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख प्रशांत सांळुखे, जिल्हा परिषद माजी सदस्य रामचंद्र सरवणकर, विधानसभा महिला संघटक सायली पवार, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, विभागप्रमुख किरण तोडणकर, मयुरेश पाटील, अमित खडसोडे, माजी नगरसेवक सलील डाफळे, रशीदा गोदड, सेजल बोराटे, हिना दळवी, स्मिता काटकर, राजश्री शिवलकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदी भाषा सक्तीचा केंद्रबिंदू ठाण्यात – बाळ माने

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारवर टीका केली. महानगरपालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हिंदी भाषिक मतदारांना लॉलीपॉप दाखवण्याचे काम हे राज्य सरकार करत आहे. पण पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय आम्ही रद्द करायला लावू. 5 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातही महाविकास आघाडी राज्य सरकाराला धारेवर धरणार असल्याचे यावेळी सांगितले. हिंदी भाषा सक्ती करण्याचा केंद्रबिंदू ठाण्यात असल्याची टीका बाळ माने यांनी केली.