BSF जवानांसाठी पाठवली जीर्ण अवस्थेतील घाणेरडी ट्रेन; विरोधकांनी आवाज उठवल्यावर सरकारला जाग, 4 अधिकाऱ्यांचं निलंबन

देशाचे रक्षण करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसाठी जीर्ण अवस्थेतीतल घाणेरडी ट्रेन पाठवण्यात आल्याचे समोर आले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ट्रेनची अवस्था अत्यंत खराब असल्याचे दिसत आहे. फाटलेल्या गाद्या, तुटलेल्या खिडक्या, अस्वच्छ टॉयलेट्स आणि ठिकठिकाणी साचलेली धूळ अन् कचरा या ट्रेनमध्ये दिसत होता. विरोधकांनीही हा मुद्दा लावून धरल्यानंतर पीआरमध्ये गुंग असलेल्या सरकारला जाग आली असून चार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले.

बीएसएफच्या 1200 जवानांचे एक पथक अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जात होते. हे सर्व जवान त्रिपुरातील उदयपूरहून येथून मार्गस्थ होणार होते. त्यांच्यासाठी विशेष ट्रेनची मागणी करण्यात आली होती. या लांबच्या प्रवासात जवानांना आराम करता यावा यासाठी बीएसएफने दोन एसी 2 टायर कोच, दोन एसी 3 टायर कोच, 16 स्लीपर कोच आणि 4 जनरल कोचची मागणी केली होती. ही ट्रेन त्रिपुरा, आसाम, पश्चिम बंगालमधील चार ठिकाणी थांबून इतर जवानांनाही आपल्यासोबत नेणार होती. मात्र रेल्वेने बीएसफ जवानांना जीर्ण अवस्थेतीत घाणेरडी ट्रेन दिली. या ट्रेनला लावण्यात आलेल्या कोचची अवस्था अत्यंत खराब होती.

विरोधकांची टीका

जीर्ण अवस्थेतील घाणेरड्या ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. सरकारचे लक्ष फक्त पीआरकडे असल्यावर असेच घडणार आणि जनतेला जनावरांसारखाच प्रवास करावा लागणार, अशी टीका काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

चार अधिकारी निलंबित

सोशल मीडियावरही हा मुद्दा गाजला आणि नेटकऱ्यांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर सरकारला जाग आली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीपूरद्वार रेल्वे विभागाचे तीन वरिष्ठ अभियंते आणि एका कोचिंग डेपो अधिकाऱ्याला निलंबित केले. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

रेल्वेचे स्पष्टीकरण

दरम्यान, सर्वत्र छिथू झाल्यानंतर रेल्वेने याबाबत स्पष्टीकरण दिले. ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी केके शर्मा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, व्हायरल व्हिडीओत दिसणारे कोच प्रवाशांसाठी नव्हते. हे कोच देखभालीसाठी ट्रेनला जोडण्यात आले होते.