सामना अग्रलेख – पुनःपुन्हा अवकाळीचे संकट… शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे काय?

आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱ्यांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱ्यांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!

गारपिटीचे तडाखे आणि अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावरच उठले आहे. गेले दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा भयंकर धुमाकूळ सुरू आहे. गारपिटीच्या तडाख्याने हजारो हेक्टरवरील फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतांमध्ये गारांचा खच पडला आहे. कश्मीर वा हिमाचलमध्ये हिमवर्षावानंतर जशी बर्फाची चादर पसरल्यासारखे दृश्य दिसते, तशी अवस्था उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिसत आहे. नाशिक, नगर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये तर या गारपिटीचे रूप अधिकच रौद्र होते. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडय़ातील जालना, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिके व फळबागांची मोठी हानी झाली. सतत येणाऱया अवकाळीच्या तडाख्याने मका, ज्वारी, गहू, कांदा, हरभरा या पिकांचे पुन्हा एकदा नुकसान झाले. गोळीबाराचा वर्षाव व्हावा, अशी गारपीट झाल्याने शेतातील कलिंगड व खरबुजांच्या चिंधडय़ा उडाल्या. द्राक्ष बागा कोलमडून पडल्या. द्राक्षांबरोबरच केळी व संत्र्याच्या बागांचेही अवकाळी पावसाने अपरिमित नुकसान झाले आहे. कोकणातही जांभूळ, काजू, कोकम, आंब्याला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना दिलेला हा तिसरा फटका आहे. प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत एकंदर 14 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा जबर तडाखा बसला. यात सुमारे 28 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत असले तरी हजारो हेक्टरवरील नुकसानग्रस्त भागांचे अद्याप पंचनामे न झाल्यामुळे

आपत्तीग्रस्त क्षेत्राचा आकडा

वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे निसर्गाच्या अवकृपेचा ससेमिरा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही आणि दुसरीकडे या अरिष्टात सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसत नाही. अशा दुहेरी संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. मार्च महिन्यात राज्याच्या अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठेच नुकसान केले. या संकटातून शेतकरी वर्ग सावरत नाही, तोच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातही वादळी पाऊस आणि गारपिटीच्या भयंकर तडाख्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतमालाचे, फळबागांचे, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान केले. गेले दोन दिवस गारपिटीने कहर केला असतानाच अजूनही दोन-तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा अवकाळी पाऊस थैमान घालू शकतो असा कयास काही अभ्यासक व्यक्त करीत आहेत. दुर्दैवाने हे अंदाज खरे ठरले तर शेतकऱ्यांचे काय हाल होतील, याची कल्पनाही करवत नाही. हजारो रुपये खर्चून घेतलेली पिके, लाखो रुपये खर्च करून कष्टाने फुलवलेल्या बागा डोळय़ांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटतो आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात कोसळलेल्या अवकाळीच्या संकटामुळे बळीराजाला नैराश्याच्या गर्तेतच ढकलले आहे. त्यांना धीर देण्याचे, आधार देण्याचे व प्रत्यक्ष नुकसानभरपाई देऊन शेतकऱयांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम सरकारने करायला हवे, नव्हे सरकारचे ते कर्तव्यच आहे. तथापि, राजकीय उखाळय़ा-पाखाळ्या काढण्यात आणि विरोधकांना कोणत्या गुह्यात गुंतवून तुरुंगात धाडता येईल, याविषयीची

कारस्थाने आणि खलबते

करण्यातच या सरकारचा निम्म्याहून अधिक वेळ जातो. सुडाच्या राजकारणातच रमलेल्या राज्यकर्त्यांकडे शेतकऱयांचे दुःख समजून घेण्यासाठी, त्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी व शेतकऱयांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ कुठून असणार? मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये एक लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनीतील पिकांची, फळबागांची नासाडी झाली. त्यापाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळीच्या तिसऱ्या फटक्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जे उगवले, पिकले ते निम्म्याहून अधिक अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात उद्ध्वस्त होते आणि जे पीक हाती आले त्याला भाव मिळत नाही, अशी शेतकऱ्यांची दारुण अवस्था झाली आहे. आधीच्याच नुकसानभरपाईची मदत सरकारी नियम व फायलींच्या प्रवासात कागदावरच अडकून पडली आहे आणि त्यात पुनःपुन्हा अवकाळीचे संकट कोसळते आहे. यामुळे आपल्याला कोणी वालीच उरला नाही, अशी भावना शेतकऱयांच्या मनात बळावते आहे. शेतकऱ्यांना रामभरोसे सोडून मिंधे सरकारचे राजे मात्र अयोध्येत श्रीरामासमोर शक्तिप्रदर्शन करत होते. चोहोबाजूंनी टीका होताच अयोध्येची यात्रा संपल्यानंतर मिंधे सरकार आता बांधावर पोहोचले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जनतेला वाऱयावर सोडून यात्रेला जाणे यालाच ‘राजधर्म’ म्हणायचे काय? संकटकाळात प्रजेसोबत नसणे रामराज्याच्या संकल्पनेत बसते काय? बांधावर येणाऱ्या मिंधे सरकारला शेतकऱयांनी आता हे प्रश्न विचारलेच पाहिजेत!