
अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेमागचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. या अपघाताने अवघा देश सुन्न झाला असून मृतांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने सारेच हेलावून गेले आहेत. छिन्नविच्छिन्न झालेले 270 मृतदेह आतापर्यंत हाती लागले असून त्यातील सात जणांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश आहे. दरम्यान, एनआयए, डीजीसीए, ब्रिटनची आयबा यासह सात एजन्सी चौकशी करणार आहेत. डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या छतावर विमानाचा ब्लॅक बॉक्स आढळून आला असून अपघाताच्या तपासाला त्यामुळे गती मिळणार आहे.
लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर विमान अवघ्या 32 सेकंदांत कोसळले आणि मोठी मनुष्यहानी झाली. शुक्रवारी दुसऱया दिवशी अपघाताच्या चौकशीला वेग देण्यात आला. गुरुवारी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) अपघाताची प्राथमिक चौकशी सुरू केली होती. त्यापाठोपाठ इतर तपास यंत्रणा विविध दृष्टिकोनातून अपघाताचा तपास करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. हिंदुस्थानच्या स्थानिक यंत्रणा आणि ब्रिटनच्या संस्था अशा प्रकारे एकूण सात तपास यंत्रणा अपघाताची चौकशी करणार आहेत. त्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), गुजरात पोलीस, विमान अपघात तपास पथक (एएआयबी), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए), ब्रिटनची हवाई अपघात चौकशी शाखा, अमेरिकेचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ, फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन यांचा समावेश आहे.
मृतांची ओळख पटवण्याचे आव्हान
विमान अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सलग दुसऱया दिवशीही सुरू होते. विमानाचा भीषण स्पह्ट होऊन आगीचा भडका उडाला होता. त्यात प्रवासी होरपळले. त्यामुळे मृतांची ओळख पटवणे मुश्कील बनले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाचीही अद्याप ओळख पटलेली नाही. मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांची डीएनए चाचणी केली जात असल्याचे अहमदाबाद पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
– आतापर्यंत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 270 हून अधिक मृतदेहांचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे. याशिवाय 220 जणांचे डीएनए सॅम्पलिंग करण्यात आले असून 7 मृतदेहांची ओळख पटली आहे.
ब्लॅक बॉक्स सापडला गूढ उकलणार
हॉस्टेलच्या छतावर आज ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळे अपघात घडण्याच्या आधी नेमके काय घडले याचे गूढ उकलेल.